आडाळी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खनिजयुक्त मातीची वाहतूक

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांना चौकशी करण्याचे आदेश

सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करून तेथील खनिजयुक्त मातीची वाहतूक केली जात असल्याचा आरोप सातत्याने होत होता. या प्रकरणाची  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर नोंद घेतली आहे. या प्रकरणी मंत्री सामंत यांनी तात्काळ सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांना दूरध्वनी करून चौकशी करण्याचे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आडाळी येथील अवैध उत्खननाच्या पार्श्वभूमीवर, दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष घटनास्थळाची पहाणी केली. यानंतर या गंभीर प्रकरणाचे पुरावे, छायाचित्रे आणि सविस्तर निवेदन घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळी विषय समजून घेतल्यावर मंत्री सामंत यांनी तात्काळ सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी 

हा सर्व प्रकार दोडामार्गचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या संगनमताने चालू आहे. या संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी संबंधित तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची ‘नार्को टेस्ट’ (आरोपीला विशिष्ट औषध देऊन अर्धवट बेशुद्ध करून त्याच्याकडून माहिती मिळवणे) करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक संजू परब यांनी केली आहे.