रेल्वेने कोल्हापुरात प्रतिदिन २०० बांगलादेशी घुसखोर येत असल्याचा ‘रेल्वे प्रवासी संघटने’चा आरोप !

कोल्हापूर – महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांवर कारवाई चालू झाल्यामुळे बांगलादेशी नागरिक प्रतिदिन कोल्हापूर येथे येत आहेत. ‘गोंदिया-कोल्हापूर’ एक्सप्रेस रेल्वेने २०० च्या आसपास बांगलादेशी नागरिक कोल्हापूर येथे येत असल्याचा आरोप मुंबई विभागीय रेल्वे संघटनेने केला आहे. (जे एका संघटनेच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? – संपादक) गेल्या १५ ते २० दिवसांत सर्वाधिक बांगलादेशी नागरिक येथे आल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला. या संदर्भात शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी ‘आमच्याकडे कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. असे बांगलादेशी आल्याचे निष्पन्न झाल्यास आम्ही चौकशी करून कारवाई करू’, असे सांगितले आहे.

‘रेल्वे प्रवासी संघटने’चे सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले, ‘‘राज्यातील इतर शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांवर कारवाई चालू झाल्याने ते सुरक्षेसाठी कोल्हापूर येथे येत आहेत. औद्योगिक वसाहतीत किंवा मिळेल ते काम करण्यासाठी येत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई  करावी.’’

संपादकीय भूमिका

अशा घुसखोरांना पोलीस प्रशासनाने स्वत: शोधून कारवाई करणे अपेक्षित आहे !