मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नोंदवलेला फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

१. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलाकारांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद

१० नोव्हेंबर २०१० या दिवशी ‘सोनी टीव्ही’वरील एका कार्यक्रमात हास्य कलाकार शेखर सुमन आणि भारती सिंह यांनी मुसलमानांशी संबंधित एका शब्दावर विनोद केला होता. या विनोदाला आक्षेपार्ह ठरवून मुसलमान समाजाने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. त्या काळी केंद्रात आणि महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे त्या कलाकारांच्या विरोधात रझा अकादमीच्या पदाधिकार्‍यांनी तक्रार केली आणि पोलिसांनी ‘भारतीय दंड विधान कलम २९५ अ’नुसार तत्परतेने फौजदारी गुन्हा नोंदवला. ही तीच रझा अकादमी होती, जिने रोहिंग्यांवर झालेल्या कथित अन्यायाविरुद्ध मुंबईत मोठी दंगल केली होती, ज्यात महिला-पुरुष पोलिसांवर आक्रमण केले होते.

२. ‘कलम २९५ अ’च्या गुन्ह्यात वरिष्ठांची संमती हवी !

‘भारतीय दंड विधान कलम २९५ अ’च्या अंतर्गत लागू केलेल्या गुन्ह्यात ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’च्या कलम १९६ नुसार वरिष्ठांची संमती घेणे आवश्यक असते. हा गुन्हा १० नोव्हेंबर या दिवशी नोंदवलेला असला, तरी पोलिसांनी तशी संमती घेतली नव्हती किंवा त्यांच्या वरिष्ठांनी ती दिली नव्हती.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

३. मुंबई उच्च न्यायालयाकडून गुन्हा रहित

हास्य कलाकारांनी फौजदारी गुन्हा रहित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. तेथे त्यांनी युक्तीवाद केला, ‘केवळ एक वाक्य बोलल्याने गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. ते वाक्य जाणीवपूर्वक द्वेषपूर्ण होते का ? किंवा त्यांचा धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू होता का ?, हेही बघायला पाहिजे.’ या वेळी ‘अशा पद्धतीने फौजदारी किंवा कायदेशीर प्रक्रिया राबवता येणार नाही’, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. न्यायालय पुढे म्हणाले, ‘दूरचित्रवाहिनीवरील कलाकार यांची तुलना राजकारण्यांशी करू नये. संपूर्ण कार्यक्रम तटस्थपणे पाहिला पाहिजे. संपूर्ण कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असेल, तरच गुन्हा नोंदवता येतो.’ वर्ष २०१० मध्ये गुन्हा नोंदवला, तरी २०२६ पर्यंत यासंदर्भात वरिष्ठांकडून संमती मिळाली नव्हती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हास्य कलाकारांची फौजदारी याचिका संमत केली आणि त्यांच्या विरोधातील गुन्हा रहित केला.

४. पोलिसांचा हिंदू आणि मुसलमान यांच्यात दुजाभाव

हिंदूबहुल असलेल्या देशात पोलिसांची दुटप्पी भूमिका प्रकर्षाने जाणवते. हिंदु देवता वा संत यांच्या विरोधात कुणी कितीही निंदाजनक वक्तव्य केले, तरी पोलीस आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवत नाहीत. धर्मांधांच्या संदर्भात तत्परतेने कार्यवाही केली जाते. पोलिसांनीही त्यांच्या वर्तणुकीत आता पालट करणे आवश्यक आहे, हेच मुंबई उच्च न्यायालयाचे हे निकालपत्र दर्शवते, असे वाटते.’ (२०.५.२०२६)

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय