Consumer Court Orders Railway : प्रवाशांना २० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा ग्राहक आयोगाचा रेल्वेला आदेश

  • आरक्षित तिकीट असतांनाही ४ प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागल्याचे प्रकरण

  • प्रवाशांच्या जागेवर बसले होते रेल्वे कर्मचारी !

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील ‘भोजपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगा’ने तिकीट असूनही उभे राहून प्रवास करावा लागल्याने प्रवाशांना २० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचे आदेश रेल्वेला दिला.

१. ‘एल्टीटी पटना एक्सप्रेस’मध्ये ४ प्रवासी विंध्यांचल ते अरा या मार्गावर प्रवास करत होते. प्रवासापूर्वी त्यांनी तिकीट काढले होते. ‘बी-४’ डब्यामध्ये त्यांच्या जागा आरक्षित होत्या; पण तिथे अगोदर कुणीतरी बसले होते. त्यांनी चौकशी केले असता ते  रेल्वेचे कर्मचारी असल्याचे समोर आले. त्या कर्मचार्‍यांनी जागेवरून उठण्यास नकार दिला.

२. प्रवाशांनी रेल्वे अधिकार्‍यांकडे तक्रार करून साहाय्य मागितले; पण त्यांना साहाय्य मिळाले नाही. यामुळे चारही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला. या प्रवाशांनी रेल्वे सेवा आणि रेल्वे मंत्रालय यांच्याकडे तक्रार केली. याचाही नोंद घेण्यात आली नाही. (याला उत्तरदायी असणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) शेवटी  प्रवाशांनी ‘भोजपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगा’कडे धाव घेतली.

३. आयोगाने याप्रकरणी उत्तर मध्य रेल्वे आणि रेल्वे मंत्रालय यांना प्रवाशांच्या आरक्षणाचे पैसे (१ सहस्र ८७६ रुपये) आणि वर्षाचे ८ टक्के व्याज, असे २० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश रेल्वेला दिला. ६० दिवसांमध्ये हे पैसे प्रवाशांना देण्याची सूचना आयोगाने केली असून ६० दिवसांत पैसे न दिल्यास शेष रक्कमेवर १० टक्के वार्षिक व्याज आकारले जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

रेल्वेने हे पैसे या रेल्वे कर्मचार्‍यांकडून वसूल करून त्यांना नोकरीतून बडतर्फच केले पाहिजे !