स्वावलंबी, मुलांना पूर्णवेळ साधना करायला पाठिंबा देणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेल्या पुणे येथील श्रीमती हिरा चंद्रकांत अहिरे (वय ७३ वर्षे) !

श्रीमती हिराबाई अहिरे

१. लहानपणापासून कष्टमय जीवन असणे आणि यजमानांच्या निधनानंतर ४ मुलांसह माहेरी येणे अन् खंबीर राहून मुलांचा सांभाळ करणे

‘आईने लहानपणापासून कष्टात जीवन काढले आहे. आईच्या विवाहानंतर ७ वर्षांतच माझ्या बाबांचे निधन झाले. बाबांच्या निधनाच्या वेळी आम्ही चारही भावंडे लहान होतो. आईला सासरी पुष्कळ त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे ती आम्हाला घेऊन तिच्या माहेरी आली. चार मुलांना घेऊन आई-वडिलांकडे रहाणे, हे तिला अवघडच होते; मात्र ती डगमगली नाही. ‘लेकरांचा सांभाळ करणे’, हेच तिने तिच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवले. कौटुंबिक जीवनात एका मागोमाग येणारी संकटे आणि माझ्या दादाच्या जीवनातील प्रसंग यांवर तिने धिराने मात केली.

२. आईने आमच्यावर चांगले संस्कार केले; म्हणून आमच्या शाळेतील शिक्षकही आईचे कौतुक करायचे.

कु. नीता अहिरे

३. सतत कार्यरत असणे

आईचा या वयातही कामाचा उत्साह तरुणांना लाजवेल, असाच आहे. आई पुष्कळ कष्टाळू आहे. तिला ‘सतत काहीतरी करत रहावे’, असे वाटते.

४. आई कोणत्याही प्रसंगात शांत आणि स्थिर असते.

 ५. निश्चयी (जिद्दी) असणे

आई पहिल्यापासूनच निश्चयी (जिद्दी) स्वभावाची आहे. विणकाम असो, घरकाम करणे, घराची स्वच्छता असो, ती हातात घेतलेली गोष्ट पूर्णत्वास नेते. तिने आम्हा मुलांना पुष्कळ कठीण प्रसंगांत कष्टाने सांभाळले.

६. स्वावलंबी

आईला वयोमानानुसार शारीरिक त्रास होत असतो; मात्र तिचे त्याविषयी काही गार्‍हाणे नसते. ती या वयातही स्वतःची सर्व कामे स्वतः करते.

७. मुलांना साधना करायला पूर्ण पाठिंबा देणे

आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करू लागलो. आम्ही सेवा करून काही वेळा रात्री उशिरा घरी येत होतो; मात्र आई आम्हाला कधीच रागावली नाही. नातेवाईक आईला म्हणायचे, ‘‘तरुण मुले ‘सेवा आणि साधना’ करण्यासाठी बाहेर असतात. त्यांचे हे वागणे योग्य नाही.’’ तेव्हा आई त्यांना ठामपणे उत्तरे देत असे, ‘‘माझी मुले चांगल्या मार्गाला लागली आहेत.’’ दादा, त्याची पत्नी आणि दोन्ही मुले रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात; मात्र आईचे त्याविषयी काही गार्‍हाणे नसते. ‘एवढ्या लहान वयात ते चांगल्या ठिकाणी आहेत आणि चांगल्या मार्गाला लागले आहेत’, याचे तिला पुष्कळ समाधान वाटते. तिचा त्याग पुष्कळ आहे.

८. संत किंवा साधक घरी आल्यास आईला आनंद होतो.

९. ‘आईचे मन एखाद्या निरागस बालकाप्रमाणे आहे’, असे जाणवणे

‘तुमचे कुटुंब साधनेत आहे. तुमचा पुष्कळ त्याग आहे’, असे म्हणून साधक आईचे कौतुक करतात. याविषयी तिला काही वाटत नाही. ‘सर्व गुरुदेवांची कृपा’, असे ती म्हणते. ती पुष्कळ भोळी आहे. ‘तिचे मन एखाद्या निरागस बालकाप्रमाणे आहे’, असे मला जाणवते.

१०. आईला दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करायला आवडते. ती त्यातील साधनेविषयीचे सर्व लेख वाचते आणि आम्हाला सांगते.

११. श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव अन् श्रद्धा

अ. आईची प.पू. गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) पुष्कळ श्रद्धा आहे. ती प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करते आणि त्यांना आळवते. आई सत्संग ऐकतांना सतत भावस्थितीत असते. त्या वेळी तिचा श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्याप्रती असलेला भाव तिच्या चेहर्‍यावर दिसत असतो. तिला भावाश्रू आवरत नाही.

आ. आई श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधते. ती एकटी असतांना मोठ्याने श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्याशी बोलत असते. घरात कोणतीही चांगली घटना घडली, तर ‘श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या कृपेमुळेच झाले’, असे ती सतत सांगते.

इ. दादाने नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवणे आणि तसे करणे, याला आईने कसलाही विरोध केला नाही. ‘प.पू. गुरुदेवांनी त्याला बुद्धी दिली. आता तेच त्याचा सांभाळ करतील’, अशी तिची दृढ श्रद्धा आहे.

ई. ‘तू चारही मुलांना चांगले सांभाळलेस. त्यांच्यावर चांगले संस्कार केले’, असे म्हणून आता आईच्या सासरकडील व्यक्ती आईचे कौतुक करतात. तेव्हा आई कर्तेपणा गुरुदेवांना अर्पण करते. ‘गुरुदेव जीवनात आहेत; म्हणून सर्व निभावले’, अशी तिची ठाम श्रद्धा आहे.

उ. तिच्या आजारपणात तिला दिलेला नामजप ती श्रद्धेने पूर्ण करते. तिच्या आजारासाठी नामजप मिळाल्यावर ‘प.पू. डॉक्टर, सद्गुरु आणि संत आपल्यासाठी पुष्कळ करतात’, असा तिचा भाव असतो.

ऊ. तिला कित्येक रात्री झोप लागत नाही. तिला रात्री त्रास झाला, तरीही ती सहन करते. तिला झोप लागली नाही, तर ती ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप अधिक वेळ करते. ‘आपले भोग आपल्यालाच भोगायला हवेत. ते भोगण्यासाठी प.पू. गुरुदेवांनी शक्ती आणि बळ द्यावे’, असा तिचा विचार असतो. ती तशा प्रार्थनाही करते.

ए. ‘तिला सर्व आजारपणातून बाहेर काढणारे आणि नवीन जीवन प्रदान करणारे प.पू. गुरुदेवच आहेत’, अशी तिची ठाम श्रद्धा आहे. ती सतत कृतज्ञताभावात असते. कधी कृष्णाशी बोलणे, कधी गुरुदेवांना आत्मनिवेदन करणे, तर कधी मानसपूजा करणे, असा तिचा दिनक्रम असतो.

१२. अनुभूती

अ. आम्ही सेवेहून घरी परत येईपर्यंत आई घरी एकटीच असायची. तिच्या श्रद्धेमुळे ‘गुरुदेव सतत तिच्या समवेत आहेत’, असे तिला जाणवायचे. एकदा ती घरी एकटी असतांना तिला सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाले.

आ. आई साधकांसाठी असलेले सत्संग ऐकते. इतर वेळी तिला दोन्ही कानांनी ऐकू येत नाही; मात्र सत्संगातील सर्व सूत्रे तिला ऐकू येतात.

१३. रामनाथी आश्रमात वास्तव्य करून आल्यावर आईमध्ये जाणवलेले पालट

आम्ही ६ मास रामनाथी आश्रमात वास्तव्यास होतो. तेथून घरी आल्यापासून आईमध्ये पुष्कळ चांगले पालट झाले आहेत. ती शांतपणे परिस्थिती स्वीकारत आहे. तिच्या चेहर्‍यावर एक तटस्थता आणि निरागसता जाणवते. ती सर्व गोष्टींपासून अलिप्त झाली आहे आणि तिच्यात साक्षीभाव जाणवत आहे.

गुरुदेवा, तुमच्या कृपेनेच मी आईविषयी लिहू शकले. ‘आईमधील गुण माझ्यामध्ये येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. नीता चंद्रकांत अहिरे (श्रीमती हिरा अहिरे यांची मुलगी), पुणे (५.३.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.