मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘प्रभादेवी, मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने १७ मे २०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ दिव्य वातावरणात पार पडला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री राजमातंगी महायागाच्या वेळी पूर्णाहुती देतांना  श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि अन्य पुरोहित

१. यज्ञस्थळी पाऊल ठेवताक्षणी आत्यंतिक कृतज्ञताभाव जागृत होऊन मन निर्विचार होणे 

‘१७.५.२०२६ या दिवशी या महायज्ञाच्या वेळी मी यज्ञस्थळी पाऊल ठेवताक्षणी माझा पुष्कळ कृतज्ञताभाव जागृत झाला. माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. माझे मन निर्विचार झाले होते. यज्ञस्थळी उपस्थित असणार्‍या सर्व जिवांबद्दल मला अत्यंत प्रेम वाटत होते. ‘सतत याच स्थितीत रहावे’, असे मला वाटत होते. माझी ही स्थिती दुसर्‍या दिवसापर्यंत टिकून होती. मी आयुष्यात याआधी अशी स्थिती कधीच अनुभवली नव्हती.

सौ. जयश्री पाटील

२. यज्ञस्थळी असलेल्या संतकक्षात बसल्यानंतर आलेल्या अनुभूती

यज्ञस्थळी असलेल्या संतकक्षात मी डोळे बंद करून बसले होते. तेव्हा ‘श्री राजमातंगीदेवीचे अस्तित्व मला अनुभवता येऊ दे’, अशी मी देवीला कळकळीने प्रार्थना केली.

अ.  माझे डोळे बंद असताना आरंभी माझे मन निर्विचार झाले.

आ. माझा श्वासोच्छ्वास एका लयीत होत होता. मला शांतीची अनुभूती येत होती.

इ. नंतर ‘आकाशातून पांढरा प्रकाश येत आहे आणि तो प्रकाश माझ्या सहस्रारचक्रातून देहात प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले. मला सहस्रारचक्रावर संवेदना जाणवल्या. ‘तो प्रकाश माझ्या सहस्रारचक्रातून प्रवेश करून पायांच्या बोटांपर्यंत जात आहे’, असे मला जाणवले.

ई. माझे शरीर हलके होऊन माझे मन प्रसन्न झाले. ‘याच स्थितीत बसून  रहावे’, असे मला वाटत होते.

उ. मला एका वेगळ्याच लोकात गेल्यासारखे जाणवले.’

– सौ. जयश्री पाटील, नवी मुंबई (२३.५.२०२६)

 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक