(म्हणे) ‘जनावरांची वाहतूक करणार्‍या वाहनांना अडवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !’ – आमदार रईस शेख

  • बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य सचिवांचे पोलिसांना रझाकारी आदेश

  • प्रमाणापेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करणे अवैध !

समाजवादी पक्षाचे भिवंडी (पूर्व) चे आमदार रईस शेख

मुंबई – जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रमाणापेक्षा अधिक जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी जनावरांच्या व्यापार्‍यांवर कारवाई करणे अवैध आहे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी २८ मे या दिवशी असलेल्या बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती समाजवादी पक्षाचे भिवंडी (पूर्व) चे आमदार रईस शेख यांनी दिली. मुंबईतील अल्पसंख्यांक समाजाचे सर्वपक्षीय आमदार, तसेच राज्य खाटिक महासंघाचे प्रतिनिधी यांची मंत्रालयात प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या समवेत बैठक झाली. यानंतर शेख बोलत होते.

बकरी ईदच्या निमित्ताने देवनार पशूवधगृहात कत्तलीसाठी असलेले २०० रुपयांचे शुल्क २० रुपये करण्यात आले. मुंबईमध्ये कत्तलीसाठी असलेली ७० ठिकाणे वाढवून ती १०९ करण्यात आली. काही गृहनिर्माण संस्थांना कत्तलीसाठी आधीच परवाने दिलेले आहेत. दुकानदारांनाही तशी अनुमती देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बकरी ईदच्या दिवशी गोहत्या मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू आहे. अशा वेळी गोरक्षकांनी जनावरांनी भरलेली वाहने रोखली, तर त्यांच्यावरच कारवाईचा आदेश देणे, हे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ याचाच प्रकार होय. हिंदूंनी अशा रझाकारी आदेशांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली पाहिजे !