तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी ‘लिट्टे’चा प्रमुख प्रभाकरन् याला वाहिली श्रद्धांजली

(लिट्टे म्हणजे ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम्’ - तमिळ राष्ट्र मुक्ती वाघ)

डावीकडून मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि व्ही. प्रभाकरन्

चेन्नई (तमिळनाडू) – भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि भारतीय सैनिकांची हत्या करणारा ‘लिट्टे’चा प्रमुख व्ही. प्रभाकरन् याची १८ मे या दिवशी पुण्यतिथी होती. त्याला तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी श्रद्धांजली वाहिली. वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेतील मुल्लीवाइक्कल येथे श्रीलंकेच्या सैन्याने प्रभाकरन्‌वर गोळ्या झाडून त्याला ठार मारले होते. विशेष म्हणजे भारतात लिट्टेवर बंदी आहे. राजीव गांधी काँग्रेस पक्षाचे प्रमुख होते. याच काँग्रेस पक्षाच्या ५ आमदारंनी जोसेफ विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. मागच्या आठवड्यात विजय यांचा शपथविधी सोहळा झाला. त्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते.

प्रभाकरन्‌साठी  विजय यांनी ‘एक्स’वर श्रद्धांजलीची पोस्ट केली. त्यात विजय यांनी लिहिले की, आम्ही मुल्लीवाइक्कलच्या आठवणी आमच्या मनात कायम ठेवू. समुद्रापलीकडे रहाणार्‍या आमच्या तमिळ बंधू-भगिनींच्या हक्कासाठी आम्ही नेहमी त्यांच्यासमवेत उभे राहू.

‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवसा’चे महत्त्व काय ?

वर्ष १९९१ मध्ये लिट्टेने राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणात प्रभाकरन् मुख्य आरोपी होता. जगभरात पसरलेला तमिळ समुदाय आणि भारतात रहाणारे तमिळी १८ मे हा ‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवस’ म्हणजे ‘तमिळ नरसंहार स्मरण दिवस’ म्हणून साजरा करतात. वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेतील गृहयुद्ध समाप्त झाले. या दिवशी मृत्यूमुखी पडलेल्या सहस्रो तमिळ नागरिकांचे स्मरण केले जाते. मुल्लीवाइक्कल या किनारपट्टीवरील गावावर श्रीलंकेच्या सैन्याने अंतिम जोरदार प्रहार केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार युद्धाच्या या अंतिम टप्प्यात जवळपास ४० ते ७० सहस्र तमिळ नागरिकांनी प्राण गमावले होते. श्रीलंकेच्या सैन्याने नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले होते. म्हणून हा दिवस ‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवस’ म्हणून तमिळी हिंदू साजरा करतात.

संपादकीय भूमिका

  • राजीव गांधी यांना ठार मारलेल्या ‘लिट्टे’ संघटनेच्या प्रमुखाला श्रद्धांजली वहाणे, हे विजय यांच्या सरकारला पाठिंबा देणार्‍या काँग्रेसला मान्य आहे का ?
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणारी काँग्रेस राजीव गांधी यांच्या हत्या करणार्‍यांना मात्र राजकीय लाभासाठी विरोध करत नाही, हे लक्षात घ्या ! यातून काँग्रेसचे गांधी परिवाराप्रतीचे प्रेम ढोंग आहे, असेच म्हणावे लागेल !