Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे विधान

कैलाश विजयवर्गीय

भोपाळ (मध्यप्रदेश) – रा.स्व. संघात लोकांची गर्दी तर झाली आहे; पण चांगल्या लोकांची कमतरता आहे. आधी चांगले लोक होते, आता अशा लोकांची संघात कमतरता आहे. संघटना वाढत आहे, विचारधाराही वाढत आहे; पण चांगले लोक नसतील, तर या विचारधारेचे महत्त्व काय ? आपण चिंतन आणि मनन केले पाहिजे, असे विधान मध्यप्रदेशाचे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी येथे केले. ते शालिगराम तोमर स्मृती कार्यक्रमात बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हेही उपस्थित होते.

कैलाश विजयवर्गीय पुढे म्हणाले की, आमचा पक्ष फार मोठा बनला आहे. जो अधिकारी येतो, तो म्हणतो की, मी पण संघाची पट्टी बांधली आहे. संघाची चड्डी घातली आहे. एका अधिकार्‍याने मला सांगितले की, ‘माझे वडील संघात जात होते.’ कुणी म्हणतो की, ‘माझे वडील संघात अध्यक्ष होते.’ सरकार आल्यानंतर सर्व अधिकारी संघाचे झाले आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर अधिकारीही स्वतःला संघाशी संबंधित असल्याचे सांगू लागले आहेत.