Hindus Only Banner : हिंदूंचे शक्तिपीठ कंकालीतला (बंगाल) येथे ‘केवळ हिंदूंना प्रवेश’ असा लावलेला फलक पोलिसांनी हटवला

‘केवळ हिंदूंना प्रवेश’ लावलेला फलक

कोलकाता (बंगाल) –  शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कंकालीतला मंदिर परिसरात ‘केवळ हिंदूंना प्रवेश’ असे फलक लावण्यात आले होते. ही माहिती सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर त्याला विरोध झाल्यामुळे पोलिसांनी फलक हटवले.

१. स्थानिक सूत्रांनुसार विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या काही कार्यकर्त्यांनी हे फलक लावल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मते, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि इतर धर्मियांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

२. या प्रकारामुळे मंदिर समितीने चिंता व्यक्त केली आहे. समितीच्या एका सदस्याने सांगितले, ‘कंकालीतला हे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे, जिथे सर्व धर्माचे लोक श्रद्धेने येतात. अशा प्रकारचे फलक लावणे हे मंदिराच्या परंपरेच्या विरोधात आहे.’ (देवस्थान मंडळातील सदस्यांनाच धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

३. प्रशासनाने या प्रकरणाची नोंद घेतली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. शांतता भंग होऊ नये आणि धार्मिक सलोखा कायम रहावा, यासाठी पोलिसांनी हे फलक हटवण्याचे काम चालू केले आहे.

४. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून तृणमूल काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे, तर भाजपने यावर सावध भूमिका घेतली आहे.

कंकालीतला शक्तिपीठाची महती

कंकालीतला हे बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण हिंदु धर्मातील ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. जेव्हा भगवान विष्णूने त्याच्या सुदर्शन चक्राने माता सतीचे शरीर छिन्नविच्छिन्न केले, तेव्हा तिच्या शरिराचा ‘कंकाल’ (कंबर) या ठिकाणी पडला होता. येथे देवीला ‘देवगर्भा’ किंवा ‘कंकाली’ या नावाने पूजले जाते आणि तिचे रक्षक म्हणून भगवान शिव ‘रुरु’ भैरव रूपात विराजमान आहेत. या मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारची पाषाण मूर्ती नाही. त्याऐवजी एका पवित्र कुंडात (तलावात) असलेल्या शिलाखंडांची पूजा केली जाते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या शक्तिपीठांमध्ये अहिंदूंचे काय काम ? जे गोमांस भक्षण करून येतात, त्यांना हिंदूंच्या मंदिरात प्रवेश का द्यायला हवा ? त्यामुळे असे फलक जर मंदिराच्या परिसरात लावले गेले, तर त्यात चूक ते काय ?
  • तत्परतेने फलक हटवणारे पोलीस कधी हिंदूंना छळणार्‍या धर्मांधांवर अशा तत्परतेने कारवाई करतात का ?
  • आता बंगालमध्ये भाजपचे सरकार असणार आहे. त्यामुळे सरकारने प्रथम राज्यातील सर्व मंदिरांबाहेर असे फलक लावण्यासह वस्त्रसंहिताही लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !