मी नंदिग्राममध्ये केवळ हिंदूंसाठीच काम करणार ! – Suvendu Adhikari BJP Leader

कोलकाता (बंगाल) – नंदिग्राममधील मुसलमानांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मतदान केले, तर हिंदूंनी मला मतदान केले. त्यामुळे आता मी निवडून आलो असून मी नंदिग्राममध्ये केवळ हिंदूंसाठीच काम करणार आहे, असे मत ममता बॅनर्जी यांचा सलग दुसर्‍यांदा दारूण पराभव करणारे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी विजयानंतर व्यक्त केले.

अधिकारी पुढे म्हणाले,

‘‘ममता बॅनर्जी यांचे राजकारण संपले आहे. माझा विजय केवळ भाजपचाच नव्हे, तर प्रत्येक सनातनी व्यक्तीचा विजय आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी या भूमीत कमळ फुलण्याचे (भाजप निवडून येण्याचे) पाहिलेले स्वप्न साकार झाले आहे. बंगालमध्ये आशेची नवी पहाट उजाडली आहे.’’

डॉ. मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. पुढे याच पक्षाच्या काही माजी सदस्यांनी भारतीय जनता पक्षाची (भाजपची) स्थापना केली होती.