(म्हणे) ‘भारतीय मुसलमानांची ओळख पुसली जात असल्याने जगाने त्याकडे लक्ष द्यावे !’ – पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी

हिंदूंचा वंशसंहार करणार्‍या पाकिस्तानचा कांगावा !

वर्तुळात ताहिर अंद्राबी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत सरकार केवळ काश्मीरमध्ये लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्रॅफिक) पालट करत नाही, तर उर्दू भाषा आणि मुसलमानांची  संस्कृतीही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. उर्दू भाषा संपूर्ण भारतीय उपखंडातील आणि विशेषतः मुसलमानांची सामायिक ओळख राहिली आहे. भारताने यावर केलेली आक्रमणे थांबवली पाहिजेत. जगाने याकडे लक्ष दिले पाहिजे. पाकिस्तान नेहमीच यासाठी आवाज उठवत राहील; पण जगही यावर गप्प राहू शकत नाही. काश्मीरमधील भारताचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे, असा आरोप पाकने पुन्हा एकदा केला आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने त्यांना काश्मीरवरून प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.

‘मुसलमान डुकरांसारखी मुले जन्माला घालतात’ या भाजप नेत्याच्या विधानाचा केला निषेध !

उत्तरप्रदेशातील भाजपच्या नेत्या गीता त्यागी यांच्या ‘मुसलमान जिहाद करतात आणि डुकरांसारखी मुले जन्माला घालतात’, या कथित विधानावरून ताहिर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करणे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. गीता त्यागी या भारताच्या सध्याच्या सत्ताधारी पक्ष भाजपशी संबंधित आहेत. हे विधान केवळ त्यांचेच नाही, तर भाजप आणि संघ यांचे मुसलमानांविषयचे विचार दर्शवते. हे स्पष्टपणे द्वेषपूर्ण भाषण (हेट स्पीच) आहे आणि जागतिक संस्थांनी भारतीय अल्पसंख्यांकांच्या, विशेषतः मुसलमानांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी समोर आले पाहिजे.