राजीव गांधी हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा झालेला आरोपी ३१ वर्षांनंतर बनला अधिवक्ता !

मद्रास उच्च न्यायालयात रुजू !

ए.जी. पेरारीवलन्

चेन्नई – देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला आरोपी ए.जी. पेरारीवलन् ३१ वर्षांनंतर अधिवक्ता बनले असून ते मद्रास उच्च न्यायालयात रुजू झाले आहेत. सध्या पेरारीवलन् यांचे वय ५४ वर्षे आहे. ज्या न्यायव्यवस्थेच्या आदेशाने पेरारीवलन् यांनी आयुष्याची कित्येक वर्षं कारागृहात खितपत काढली, त्याच न्यायव्यवस्थेत आज ते अधिवक्ता म्हणून रुजू झाले आहेत.

वर्ष १९९१ मध्ये तामिळनाडूतील श्रीपेरूंबुदुरमधील प्रचारसभेच्या वेळी झालेल्या आत्मघाती बॉबस्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येनंतर काही आठवड्यांतच पेरारीवलन् यांच्यासह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली. पुढे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याविरोधात त्यांच्या कुटुंबियांनी बरीच वर्षे लढा दिला. यानंतर पेरारीवलन् यांच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले. त्यानंतर मे २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलन् यांची सुटका करण्याचा आदेश दिला.

सुटका झाल्यानंतर घेतले कायद्याचे शिक्षण !

कारागृहातून बाहेर पडताच पेरारीवलन् यांनी थेट बेंगळुरू गाठले आणि कर्नाटक राज्य कायदा विद्यापिठांतर्गत ‘डॉ. बी.आर्. आंबेडकर लॉ कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. वर्ष २०२५ मध्ये त्यांनी त्यांची कायद्याची पदवी घेतली आणि त्याचवर्षी ‘ऑल इंडिया बार कौन्सिल’ची परीक्षा देत अधिवक्त्याची सनददेखील प्राप्त केली.

कारागृहातील सहस्रो बंदीवानांसाठी लढायचे आहे ! – पेरारीवलन्

मद्रास उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून रुजू झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना पेरारीवलन् म्हणाले, ‘‘मला सुप्रसिद्ध अधिवक्ता वगैरे होण्याची अजिबात इच्छा नाही. ते माझे ध्येयही नाही. कायद्याचे  साहाय्य न मिळाल्यामुळे कारागृहात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या सहस्रो बंदीवानांसाठी मला लढायचे आहे. विशेषतः जन्मठेपेची शिक्षा झालेल्या, गरिबीमुळे कायदेशीर साहाय्य मिळवणे अशक्य असणार्‍या आणि केवळ त्यामुळेच स्वतःच्या सुटकेसाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करणार्‍या बंदीवानांसाठी मला काम करायचे आहे.’’