Bihar Police Tilak Controversy : गणवेशधारी पोलिसांनी टिळा लावल्यास कारवाई !

बिहारच्या पोलीस महासंचालकांची चेतावणी

पोलीस महासंचालक विनय कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – गणवेशधारी पोलिसांनी कर्तव्यावर असतांना कपाळावर टिळा किंवा कुठल्याही प्रकारचे धार्मिक चिन्ह लावल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी बिहार राज्याचे पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी राज्यातील सर्व पोलिसांना दिली.

ते पुढे म्हणाले की, पोलिसांना टोपी घालणे आणि बेल्ट लावणे अनिवार्य आहे. तसे न करणार्‍या पोलिसांवर विभागीय कारवाई केली जाईल. गणवेशधारी पोलीस दहाही बोटांत अंगठ्या घालू शकत नाहीत. महिला पोलिसांनाही कर्तव्यावर असतांना अतीश्रुंगार करण्यावर, तसेच दागिने घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस दलात एकसंधता आणि व्यावसायिक प्रतिमा राखणे, हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनेक संघटनांचा आक्षेप !

या आदेशाचा ‘विश्‍वामित्र सेना’ या संघटनेचे राष्ट्रीय निमंत्रक राजकुमार चौबे यांनी निषेध केला असून हा आदेश धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. चंदन आणि टिळा हे सनातन परंपरा अन् श्रद्धा यांचे प्रतीक असून त्यावर बंदी घालणे, हे अयोग्य आहे.

काय आहे नियम ?

‘बिहार पोलीस मॅन्युअल १९७८’नुसार कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचार्‍याला कोणत्याही धर्माचे चिन्ह, प्रतीक किंवा पेहराव प्रदर्शित करण्याची अनुमती नाही. यामध्ये हिंदु धर्मातील टिळा किंवा चंदन आणि इस्लामनुसार ठेवण्यात येणारी दाढी, यांवर समान स्वरूपात बंदी लागू आहे. गणवेशात असलेला पोलीस कर्मचारी कोणत्याही एका धर्माचा किंवा समुदायाचा प्रतिनिधी न दिसता राज्याचा प्रतिनिधी दिसावा, हा यामागील मूळ उद्देश आहे. तथापि या नियमात शीख धर्माला विशेष सवलत देण्यात आली आहे. नवरात्रीत टिळा लावण्यासाठी किंवा रमझानमध्ये दाढी ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची आगाऊ अनुमती लिखित स्वरूपात घेणे अनिवार्य आहे. अनुमतीविना असे केल्यास ते नियमांचे उल्लंघन मानले जाते.

संपादकीय भूमिका

  • स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणवणारे पोलीस नेहमी हिंदूंवरच मर्दुमकी कशी गाजवतात ? पोलिसांचा पोषाखातील ‘सेक्युलर’पणा वागण्यात कधी दिसणार ?
  • भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म हे भारताचा आत्मा आहे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने हल्लीच म्हटले आहे. असे असतांना अशा निर्णयांना तुघलकी नाही, तर काय म्हणायचे ? हिंदूंमधील अस्मिताशून्यतेमुळेच असे फतवे काढले जातात, हेही खरे !