Devdeep Chatterjee : आसनसोल (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केली काँग्रेसचे कार्यकर्ते देवदीप चॅटर्जी यांची हत्या

आसनसोल (बंगाल) – येथे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. देवदीप चॅटर्जी (वय ४३ वर्षे) असे मृताचे नाव आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी देवदीप यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक आणि काँग्रेस नेते यांनी केला आहे.

देवदीप यांच्या पत्नी पियाली चॅटर्जी यांनी सांगितले की, आम्ही २५ एप्रिलला रात्री १ च्या सुमारास एका वाढदिवसाच्या मेजवानीवरून परतत होतो. माझे पती गाडी चालवत होते. आम्ही आमच्या वसाहतीसमोर पोचलो असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोटारसायकलला आमच्या गाडीचा धक्का लागला. तेथे बसलेले काही स्थानिक तरुण आले आणि त्यांनी आमची गाडी अडवली. माझे पती गाडीतून खाली उतरले आणि क्षमा मागू लागले; पण त्या तरुणांनी वाद घालण्यास चालू केले. ही घटना आमच्या घरासमोरच घडली असल्याने ‘स्थानिक काँग्रेस नेते आणि सोसायटीचे सचिव प्रोसेनजीत पुइतांडी यांना बोलावतो’, असे माझे पती म्हणाले. त्यानंतर परिस्थिती अचानक बिघडली. त्या तरुणांनी माझ्या पतीला मारहाण करण्यास चालू केले. मी आणि माझा मुलगा हात जोडून त्यांना सोडण्याची विनवणी करत होतो; पण ते मारतच राहिले. घटनेनंतर देवदीप यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी चालू आहे ! – राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी

या घटनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्ते देवदीप चॅटर्जी यांची तृणमूल काँग्रेसशी संबंधित गुंडांनी केलेली हत्या अत्यंत निंदनीय आहे. बंगालमध्ये आज लोकशाही नाही, तर तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी चालू आहे. निवडणुकीनंतर विरोधी आवाज दडपण्यासाठी त्यांना धमकावणे, मारणे आणि संपवणे हेच आता तृणमूलचे चारित्र्य बनले आहे. (भाजप कार्यकर्त्यांची हत्या होत असतांना राहुल गांधी यांनी एकदाही त्या विरोधात आवाज उठवला नाही. जर उठवला असता, तर कदाचित् त्यांच्या कार्यकर्त्याची हत्या झाली नसती ! – संपादक)

स्थानिक काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, मारहाण करणारे तृणमूल काँग्रेसचे  नगरसेवक अनिमेश दास यांचे निकटवर्तीय आहेत. यावर अनिमेश दास यांनी म्हटले आहे की, ते शहराबाहेर असून त्यांना या घटनेबद्दल कोणतीही माहिती नाही.

संपादकीय भूमिका

कालपर्यंत तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजपच्या कार्यकर्त्यांची, तसेच तेथील हिंदूंची हत्या करत होते. आता ते काँग्रेस कार्यकर्त्यांचीही हत्या करू लागले आहेत, यास ‘प्रगती’ म्हणायचे कि व्यवस्थेची लज्जास्पद स्थिती ?