पाश्चात्त्यांच्या संपर्कात येऊनही वैदिक धर्म आणि संस्कृती टिकून रहाणे

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. पाश्चात्त्यांच्या संपर्कात वैदिक धर्म आणि संस्कृतीत इतके पालट झाले असले, तरी हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळणे

‘गेल्या २०० वर्षांत पाश्चात्त्यांच्या संपर्कात वैदिक धर्म आणि संस्कृतीत इतके पालट झाले की, ‘तो जिवंत आहे, असे म्हणता यायचे नाही’, असा अर्वाचीन पुरोगामी हिंदूंचा आक्षेप आहे. आजच्या औद्योगिक संस्कृतीच्या भीषण आपत्तीतही वैदिक म्हणजे, हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळली आहेतच. आतला माणूस कायम आहे. पोशाख तेवढा पालटलेला आहे. पोशाख पालटला की, ‘माणूस मरतो का ?’

२. धर्मनिरपेक्ष हिंदूला स्वतःच्या जिवंतपणाची निश्चिती नसतांना त्यांना हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर बोलण्याचा अधिकार नसणे

धर्मनिरपेक्ष वा पुरोगामी हिंदु अशा अर्धवटाला ‘हिंदु समाज मेला आहे’, असे वाटते. तसे उघड न बोलता त्या हिंदु समाजाच्या नावाखाली त्यांना हवी ती सुबत्ता निर्माण करायची असते. ‘न हिन्दुर्न यवनः ।’ म्हणजे ‘हिंदूही नाही आणि यवनही नाही’, अशा या निधर्मी हिंदूला स्वतःच्या जिवंतपणाची निश्चिती नाही. अशांना हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर तोंड उघडण्याचा काय अधिकार ? आणि लोकांनी तरी या मृत पिंडाचे का ऐकावे ?’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मे २०२२)