वाहतुकीच्या नियोजनाअभावी मुंबईतील ‘जनआक्रोश महिला पदयात्रे’त वाहतूककोंडी : नागरिक संतप्त !

‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा जनआक्रोश मोर्चा

मुंबई – येथे २१ एप्रिल या दिवशी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपने जांभोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत काढलेल्या ‘जनआक्रोश महिला पदयात्रे’ वाहतूक पोलिसांच्या वाहतुकीच्या नियोजनाअभावी वाहतूककोंडी झाली. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पदयात्रेला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांसह भाजपचे काही आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.

इथून चालते व्हा ! – संतप्त महिलेची प्रतिक्रिया

या वेळी एक महिला तिच्या मुलाला शाळेतून घरी नेण्यासाठी आली होती; पण आंदोलनामुळे झाल्या गर्दीमुळे तिला मुलाच्या शाळेची गाडी दिसत नव्हती. महिलेने प्रथम पोलिसांकडे दाद मागितली, तसेच मोर्चाचे नेतृत्व करणार्‍यांनाही तिची परिस्थिती सांगितली; पण तिला कुणीच दाद दिली नाही. त्यामुळे तिच्या रागाचा पारा चढला आणि ती मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर जाऊन त्यांना म्हणाली, ‘‘तुमचं हे काय चाललंय ? इथून चालते व्हा ! शेकडो लोक मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूककोंडी का करता ?’’ या वेळी ती महिला पोलिसांनाही म्हणाली, ‘‘इतकी मोठी वाहतूककोंडी होऊनही तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात ?’’ या वेळी महिलेने अपशब्दही वापरले.

आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली ! – मंत्री गिरीश महाजन

याविषयी माध्यमांशी बोलतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले,

‘‘मोर्चे सर्वच पक्षांचे निघतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, हे मान्य करावेच लागेल. वाहतूककोंडी पाहून महिला संतप्त झाल्या. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या अयोग्य भाषेत बोलल्या. त्यांनी पोलिसांत तक्रार करायला हवी होती. आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली.’’

संपादकीय भूमिका

नियोजित आंदोलनातही वाहतूक व्यवस्था सुरळीत राखू न शकणारे पोलीस काय कामाचे ? वाहतूककोंडी होईपर्यंत पोलीस काय करत होते ?