शेतकर्‍यांनी प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना घेराव घालून खडसावले

सिंधुदुर्गनगरी येथील ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास प्रकल्प व्यवस्थापन’ कार्यालय सावंतवाडीमध्ये स्थलांतरित केल्याचे प्रकरण

सावंतवाडी – सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथील ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास प्रकल्प व्यवस्थापन सिंधुदुर्ग’ हे कार्यालय शेतकर्‍यांना विश्वासात न घेता सावंतवाडीमध्ये चुकीच्या पद्धतीने स्थलांतरित करण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते राज केसरकर, लवू कदम, राहुल राठोड यांच्यासह शेतकर्‍यांनी २१ एप्रिल या दिवशी सावंतवाडी येथे या प्रकल्पाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप प्रक्षाळे आणि प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापन नितीन सावंत यांना घेराव घालत जाब विचारला.

या वेळी संबंधित अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेत केसरकर यांनी ‘कृषी सिंचन योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये अधिकारीवर्ग सहभागी आहे. केंद्रशासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मृद आणि जलसंधारण, बचत गट अन् वैयक्तिक शेतकरी यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतो. या प्रकल्पाच्या एकूण निधीपैकी ४७ टक्के निधी हा नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कार्यक्रमासाठी खर्च केला जातो. ओरोस हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून सर्व तालुक्यांतील शेतकर्‍यांसाठी ते सोयीचे आहे. असे असतांना हे कार्यालय सावंतवाडीत का हालवण्यात आले ? सावंतवाडीमध्ये हे कार्यालय अशा ठिकाणी हालवण्यात आले आहे की, ते सर्वसामान्य शेतकर्‍यांना शोधूनही सापडणार नाही, या मागचा नेमका उद्देश काय ?’ असे प्रश्न उपस्थित केले. या वेळी केसरकर आणि शेतकरी यांनी ‘सावंतवाडी येथील कार्यालय अधिकृत आहे का? हे तात्काळ लेखी स्वरूपात द्या, अन्यथा हे कार्यालय पुनश्च जिल्हा पातळीवर (सिंधुदुर्गनगरी येथे) हालवा. कार्यालयाला अनुमती नसल्यास उद्यापासून कार्यालय उघडू देणार नाही’, अशी चेतावणी दिली. या वेळी कार्यालय बंद करून ते जिल्हा पातळीवर नेण्याच्या संदर्भात सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे, तसेच योजनेच्या ज्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल, त्याची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन वरिष्ठ निरीक्षक प्रक्षाळे यांनी दिले.