भारताला समजून घ्यायचे असेल, तर संस्कृत जाणून घेणे अनिवार्य ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

नवी देहली – संस्कृत केवळ एक भाषा नाही. भारतात ‘संस्कृत’ राष्ट्राचा आत्मा आहे; कारण ती विचार, जीवन आणि संस्कृती यांची सर्वांत प्राचीन परंपरा आहे, जी आजही जिवंत आहे. भारतियांना कर्तव्य पूर्ण करायचे असेल, तर भारताला समजून घ्यावे लागेल, स्वतःला भारत व्हावे लागेल. भारताला समजून घ्यायचे असेल, तर संस्कृत जाणून घेणे अनिवार्य आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ते येथे ‘संस्कृत भारती’ संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ही संस्था संस्कृतला एक जिवंत आणि व्यापकपणे वापरली जाणारी भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.

प.पू. सरसंघचालकांनी मांडलेली सूत्रे

भाषा शिकणे हे वातावरण आणि नियमित वापर यांमुळे सोपे होते !

माझ्या लहानपणी जेव्हा शाळेत संस्कृत शिकवले जायचे, तेव्हा ते कठीण वाटायचे. अभ्यासक्रमात श्लोक पाठ करावे लागत, ज्यामुळे संस्कृत ही एक अवघड भाषा असल्याचा समज निर्माण झाला; मात्र तेच श्लोक जेव्हा घरात नैसर्गिकरित्या ऐकायला मिळायचे, तेव्हा ते कधीच कठीण वाटले नाहीत. हीच समस्या आजही कायम आहे; विद्यार्थ्यांना संस्कृत ही कठीण भाषा वाटते; पण प्रश्न असा उरतो की, ती इतकी कठीण का वाटते ? वास्तविक भाषा शिकण्याची सर्वांत सोपी आणि प्रभावी पद्धत ही पाठ्यपुस्तके नसून संवाद आहे. भाषा शिकणे हे वातावरणातून आणि नियमित वापरामुळे सोपे होते.

भाषा शिकण्याची सर्वोत्तम पद्धत, म्हणजे ती भाषा बोलणार्‍या लोकांमध्ये मिसळणे !

मी जेव्हा भारतभर प्रवास करतो, तेव्हा मला विविध प्रादेशिक भाषांमधील विशिष्ट शब्द ठाऊक नसले, तरी त्यामागील भावना आणि अर्थ समजणे मला शक्य होते. सतत ऐकल्याने आणि बोलल्याने भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात केली जाते. त्यामुळे भाषा शिकण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे ती भाषा बोलणार्‍या लोकांमध्ये मिसळणे, त्यांचे ऐकणे आणि सतत बोलणे हीच आहे.

संपादकीय भूमिका

‘संस्कृत’ला भारताची राष्ट्रभाषा घोषित करून ती शाळेत पहिलीपासून  शिकवण्याचा कायदा करणे आवश्यक झाले आहे !