सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

 २०० हून अधिक महिलांनी घेतला मार्गदर्शनाचा लाभ !

प्रवचनाला उपस्थित असलेल्या महिला

सांगली, १५ एप्रिल (वार्ता.) – आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही. हे शास्त्र समजून न घेतल्यामुळे समाजात अशोक खरातसारखी भोंदूगिरी निर्माण होऊन सर्वसामान्यांची भगवंतावरील श्रद्धा उडते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांनी येथे केले.

‘सांगली सखी मंच’ या महिला मंडळाच्या वतीने चैत्रागोरी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा सौ. जया जोशी, सनातन संस्थेच्या सौ. सरिता चौगुले आणि परिसरातील २०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. सौ. जया जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपस्थित सर्व महिलांनी ‘आम्हाला विषय पुष्कळच आवडला असून परत एकदा तुम्ही आमच्या मंडळात या’, असे सांगितले.

उपस्थित महिलांचे अभिप्राय…

१. सौ. माया खरे – विषयामुळे मनाला पुष्कळ शांती लाभली. अध्यात्माचा खरा अर्थ आज उमजला. ‘हा विषय संपूच नये’, असे वाटत होते.

२. श्रीमती वर्षा कुलकर्णी – अध्यात्म हा प्रांत आपला नाही, असे वाटत होते; परंतु अध्यात्म आणि धर्म यांची व्याख्या स्पष्ट झाल्यामुळे जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोनच पालटला.

३. सौ. रास्ते – प्रवचन ऐकतांना आतून नामजप चालू झाला. प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले.

वैशिष्ट्यपूर्ण

प्रवचन ऐकत असतांना एका महिलेला इतका आनंद मिळाला की, तिने प्रवचन झाल्यावर देवीसाठी आणलेला बकुळीचा गजरा ‘तुम्ही आम्हाला अध्यात्मातील आनंद दिलात’, असे म्हणत श्रीमती तोफखाने यांना दिला.