अंदमानजवळच्या समुद्रात रोहिंग्या आणि बांगलादेशी असलेली नौका उलटल्याने २५० हून अधिक जण बेपत्ता

अपघातग्रस्त नौका

अंदमान – येथील समुद्रात नौका उलटून झालेल्या अपघातात २५० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. या नौकेतून २८० रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिक प्रवास करत होते. यात लहान मुलांचाही समावेश होता. ही नौका ४ एप्रिल या दिवशी दक्षिण बांगलादेशातील टेकनाफ येथून मलेशियाच्या दिशेने निघाली होती. सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी यामुळे अंदमानच्या समुद्रात ही नौका बुडाली, असे संयुक्त राष्ट्रांच्या निवेदनात म्हटले आहे.

परदेशात चांगल्या वेतनाच्या नोकरीचे आमीष आणि अनेकदा तस्करी करणार्‍या टोळ्यांकडून पसरवली जाणारी चुकीची माहिती यामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक मोठे धोके पत्करण्यास प्रवृत्त होतात. ही घटना दीर्घकाळ चाललेल्या विस्थापनाचे गंभीर परिणाम दर्शवते, असे संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना यांनी म्हटले आहे.