Navi Mumbai International Airport : आजपासून ३० शहरांत उड्डाणे होणार !

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची व्याप्ती वाढली !

  • प्रतिदिन सरासरी १५६ उड्डाणे !

नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २९ मार्चपासून देशातील ३० शहरांना जोडले जाणार आहे. यापूर्वी या विमानतळावरून १६ शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करता येत होता, आता २९ मार्चपासून या विमानतळावरून प्रवाशांना देशांतील ४६ शहरांत जाता येणार आहे. विमानतळ आस्थापनाने २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत लागू झालेले वेळापत्रक घोषित केले आहे. या विमानतळावरून आता प्रत्येक आठवड्याला अनुमाने १ सहस्र ९२ उड्डाणे केली जातील, तर प्रतिदिन सरासरी १५६ उड्डाणे होतील.

विमानतळावरून देहलीला प्रतिदिन ९ उड्डाणे, गोवा येथे ७, बेंगळुरू येथे ६ आणि कोच्चि येथे ५ उड्डाणे नियोजित आहेत. यांसह भाग्यनगर (हैदराबाद), कोलकाता, लक्ष्मणपुरी (लखनौ), वाराणसी आणि इंदूर या शहरांमध्ये विमानप्रवास करता येईल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस ही ३ विमान आस्थापने अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायांची संख्या वाढणार आहे.

नवी मुंबई विमानतळावरून कोणत्या ३० शहरांमध्ये जाता येणार ?

आग्रा, छत्रपती संभाजीनगर, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा (दाबोलीम्), गोरखपूर, हिंडन, राजकोट (हिरा सर), हुब्बळ्ळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपूरम् आणि विशाखापट्टणम्