गायीमुळे देशाच्या अर्थकारणाला दिशा मिळते ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

‘गौ टेक २०२६’ परिषद आणि प्रदर्शन

पुणे, २३ मार्च (वार्ता.) – आपण परंपरागत गायीला ‘माता’ म्हणतो; मात्र गायीपासून पुष्कळ उत्पादने सिद्ध होऊ शकतात, हे आपल्याला ठाऊक नाही. गोमूत्र, शेणापासून साकारलेल्या अनेक वस्तूंचा समावेश या अद्भुत, अद्वितीय प्रदर्शनात आहे. सर्वसामान्य माणसाला याची कल्पना येऊ शकत नाही की, गायीचे काय काय उपयोग आहेत ? देशाच्या अर्थकारणाला वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय संस्था ‘ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रिज’ (जीसीसीआय) यांच्या वतीने ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ आणि ‘आर्.आर्. काबेल’ यांच्या सहकार्याने ‘गौ टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद अन् प्रदर्शनाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह अनेक मान्यवरांनी भेट दिली.

मंत्री पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये गायीच्या शेणाचे करायचे काय ? हा अनेक शेतकर्‍यांसमोर प्रश्न आहे. त्या वेळी गोबरगॅसने समाजाची सगळी आवश्यकता पूर्ण करता येऊ शकते. सरकारनेसुद्धा गोशाळांना अनुदान देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे आपण गाय आणि त्याच्याशी निगडित मिळणार्‍या उत्पादनांकडे लक्ष द्यायला हवे.