तक्रारीच्या ४ महिन्यांनंतरही रेल्वे प्रशासनाकडून तोंडदेखले उत्तर !

रेल्वेतील अघोरी बाबांचे विज्ञापन लावल्याचे प्रकरण

जळगाव – राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असतांनाही रेल्वेगाड्यांमध्ये मात्र ‘गुरु अरशद जी’ या नावाने अघोरी बाबांची शेकडो विज्ञापने लावली गेली आहेत. याद्वारे वशीकरण (कुणालाही आपल्या प्रभावाखाली आणणे), प्रेमविवाह, विवाह मोडणे, मूठ करणी आदी अनेक दावे करण्यात आलेले होते. या विज्ञापनात संपर्क क्रमांकही दिलेले आहेत, या माध्यमातून सर्रासपणे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांना आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे. याविषयी नोव्हेंबर २०२५ मध्ये जागरूक नागरिकाने रेल्वे खात्याकडे तक्रार केली होती; पण रेल्वे प्रशासनाला जाग येण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागला आहे. मार्च २०२६ मध्ये त्यांनी ‘योग्य नोंद घेऊ’, असे पत्र दिले.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार अशा प्रकारची विज्ञापने प्रसिद्ध करणे किंवा त्यांचा प्रसार करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तरीही रेल्वेच्या आवारात होणारे हे प्रकार रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा राबवली जात नाही. (कायद्याची कठोर कार्यवाही कधी होणार ? एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विषय आला, तरी त्यांना अंधश्रद्धा संबोधणारे भोंदू बाबांच्या संदर्भात कारवाईसाठी पुढे येत नाहीत ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

४ महिन्यांनंतरही रेल्वे प्रशासन तोंडदेखले उत्तर देत असेल, तर सामान्य लोकांच्या तक्रारींची ते कशा प्रकारे नोंद घेत असेल, याचा विचारही न केलेला बरा !