‘TRP’ Suspension : केंद्र सरकारकडून वृत्तवाहिन्यांच्या ‘टी.आर्.पी.’वर ४ आठवड्यांची स्थगिती

इस्रायल-इराण युद्धाचे वार्तांकन करतांना सनसनाटी निर्माण करून नागरिकांबध्ये भीती निर्माण केल्याचा दावा

(टी.आर्.पी. म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स’ – दूरचित्रवाहिन्यांवील एखाद्या कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याचे परिमाण)

नवी देहली – केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिला’ला (बार्क’ला) निर्देश दिले आहेत की, वृत्तवाहिन्यांच्या ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स’चा (टी.आर्.पी.चा) अहवाल प्रसिद्ध करण्यावर तात्काळ ४ आठवड्यांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणावी.’ या आदेशात म्हटले आहे की, इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही वृत्तवाहिन्या अनावश्यक सनसनाटी आणि तर्काधारित सामुग्री प्रसारित करत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या लोकांचे मित्र किंवा कुटुंबीय प्रभावित भागांमध्ये रहातात, त्यांच्यात चिंता वाढू शकते.

संपादकीय भूमिका

  • युद्धाच्या बातम्या असोत किंवा अन्य घटनांच्या संदर्भातील बातम्या, वृत्तवाहिन्यांकडून त्यांना सनसनाटी स्वरूप देऊन जनतेमध्ये भीती निर्माण केली जात असल्याने अशा वाहिन्यांवर कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यासह यांचे परवानेच रहित करणे आवश्यक झाले आहे !
  • मुंबईत प्रतिवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबल्याच्या घटना घडतात; मात्र या वाहिन्या सकाळी तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाला, तरी दिवसभर तेच वृत्त दाखवत रहातात आणि लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करतात, असे पहायला मिळत असते !