काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडून वक्फ मंडळाच्या पैशांचा दुरुपयोग !

सरकारने पैशांची वसुली करावी ! – हिंदु विधीज्ञ परिषद

डावीकडून हुसेन दलवाई आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे सदस्य असतांना माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई अन् अन्य सदस्य यांनी वक्फ मंडळाच्या पैशांचा दुरुपयोग केला आहे. हा पैसा त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सरकारकडे केली आहे. याविषयी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून हा गंभीर प्रकार लक्षात आणून दिला.

शासकीय किंवा निमशासकीय अधिकार्‍यांनी शासकीय कामकाजासाठी प्रवास करतांना केवळ सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनाच विमान प्रवास अनुज्ञेय आहे. याविषयी शासन निर्णय आहे. असे असतांना हुसेन दलवाई आणि अन्य सदस्य यांनी वर्ष २०१७ मध्ये मुंबई ते छत्रपती संभाजीनगर असा येण्या-जाण्याचा प्रवास विमानाने केला. एस्.सी. तडवी, हबीब फकीह, आसिफ कुरेशी, खालाद बाबू कुरेशी आणि इम्तियाज काझी सहाब यांनी हुसेन दलवाई यांच्यासमवेत विमानातून प्रवास केला. यासाठी एकूण ६९ सहस्र ७८३ रुपये इतका व्यय झाला. स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी हा व्यय अवैधही ठरवला. त्यांनी १५ जुलै २०२४ या दिवशी वक्फ मंडळाला पत्र पाठवून याविषयीचे स्पष्टीकरण मागवले; परंतु याचे उत्तर अद्यापही देण्यात आलेले नाही, असे अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी पत्रात लिहिले आहे. (यातून वक्फ मंडळही या भ्रष्टाचारास कारणीभूत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे दलवाई यांच्यासह मंडळावरही कारवाई का होऊ नये ? – संपादक)

वक्फ मंडळाच्या पैशाचा दुरुपयोग गरीब मुसलमानांचा विश्‍वासघात !

राज्यसभेचा खासदार राहिलेला माणूस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले हुसेन दलवाई अशा प्रकारे स्वत:साठी वक्फ मंडळाच्या पैशाचा दुरुपयोग करत असतील, तर हा गरीब मुसलमान माणसाचा विश्‍वासघात नाही का ? वक्फ मंडळ आणि मुसलमान अत्यंत गरीब अन् मागासलेले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सर्व सरकारे त्यांच्यावर करदात्यांचा पैसा व्यय करतात. हा पैसा गरीब मुसलमानांसाठी व्यय करावा; जेणेकरून ते राज्यघटनेची कास धरतील, असे अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी पत्रात लिहिले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसनेच मुसलमानांची सर्वाधिक हानी केली आहे, असे अनेक तज्ञ म्हणत आले आहेत. त्याचे हे एक उदाहरण. हे हिमनगाचे टोक आहे, हेसुद्धा विसरून चालणार नाही ! मुसलमानांचे आंधळे काँग्रेसप्रेमही यास कारणीभूत आहे, हेही खरे !