सातारा येथे माजी सैनिकाच्या हत्येच्या निषेधार्थ ‘निषेध मोर्चा’ !

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला निषेध मोर्चा

सातारा, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र आणि माजी सैनिक रणजीत निकम यांच्यावर अज्ञातांकडून धारदार शस्त्राने झालेल्या आक्रमणात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्ह्यातील ‘माजी सैनिक संघटने’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ‘माजी सैनिक संघटने’चे पदाधिकारी, भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक, ‘पँरा मिलिटरी फोर्स’चे (‘अर्ध सैनिक दला’चे) सदस्य, सैनिक आणि हुतात्मा सैनिक यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, पसार झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच माजी सैनिक रणजीत निकम यांच्या आक्रमणकर्त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या घटनेमुळे खटाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून हुतात्मा निकम यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याविना आम्ही शांत बसणार नाही.

संपादकीय भूमिका

असा मोर्चा का काढावा लागतो ? पोलिसांना आतापर्यंत आक्रमणकर्त्यांना का शोधता आले नाही ?