कृषीक्षेत्रात ‘एआय’ला केंद्रस्थान ! – दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

१ कोटी शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यास केंद्रशासन साहाय्य करणार !

दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

मुंबई – उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्याच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला (‘एआय’ला) चालना देण्यासाठी ५५० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती क्षेत्रात ‘एआय’ धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच राज्याच्या कृषी विभागाने ‘महा-विस्तार’ ॲप विकसित केले आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ‘भारत विस्तार’ नावाचे एआय-आधारित बहुभाषिक कृषी साहाय्यक साधन घोषित केले आहे. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना स्थानिक भाषेत योग्य वेळी हवामान, पीक नियोजन, कीड-रोग नियंत्रण आणि बाजारपेठेची माहिती मिळेल. डिजिटल शेतीच्या विकासाची दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येते, असे महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. अर्थसंकल्प शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडवणारा ठरेल. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.

१ कोटी शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यास केंद्रशासन साहाय्य करणार !

१ कोटी शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी सरकार साहाय्य करणार आहे आणि काढणीनंतर होणारी हानी टाळण्यासाठी विकेंद्रित साठवणूक क्षमता निर्माण केली जाणार आहे. नारळ, चंदन आणि काजू यांसारख्या उच्च मूल्य नगदी पिकांचे उत्पादन वाढवले जाणार असून काजू आणि कोको यांना ‘जागतिक ब्रँड’ म्हणून उभारणी करण्यावर भर देण्यात आला आहे. मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी देशभरात ५०० नवीन ‘अमृत जलाशय’ उभारली जाणार आहेत.