बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार शांतता संदेशाने कि सैनिकी कारवाईने थांबतील, याचा विचार करावा ! – खासदार संजय राऊत

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे केंद्र सरकारला आवाहन

खासदार संजय राऊत

मुंबई – बांगलादेशामध्ये हिंदूंच्या नियमित हत्या होत आहेत. तेथे २ हिंदूंना नुकतेच  जिवंत जाळण्यात आले. मागील ४-५ मासांपासून बांगलादेशात हिंदूंच्या हत्या नियमितपणे होत आहेत. मंदिरे पाडली जात आहेत. हिंदूंच्या घरांवर आक्रमणे होत आहेत आणि हिंदूंना जाळण्यात येत आहे. केवळ शांततेचा संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबतील कि इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे सैनिकी कारवाई करूनच तेथे शांतता नांदेल, याचा विचार करावा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केले आहे.

या वेळी राऊत म्हणाले, ‘‘आपला देश निश्‍चितच शांततावादी आहे. आम्ही कधीच कुणावर स्वत:हून आक्रमण करत नाही; परंतु बांगलादेशात शेकडो हिंदूंच्या हत्या होत असतील, तर शांततेच्या संदेशाला काही अर्थ नाही. याचा अर्थ ‘युद्ध करा’, असा होत नाही; परंतु बांगलादेशातील हिंदूंचे प्राण आणि संपत्ती वाचवावी लागेल. त्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी केवळ शांततेचे संदेश देऊन उपयोग नाही. भारतातही सर्वच क्षेत्रांत अशांतता आणि अस्थिरता आहे. त्यामुळे जेव्हा शांततेचा संदेश दिला जातो, तेव्हा ‘भारतामध्ये अशांतता कुणामुळे आहे ? त्याला उत्तरदायी कोण आहे ?’ याचा विचार जनता निश्‍चितच करत असेल. जगाला शांततेचा संदेश देतांना राष्ट्रपतींनी बांगलादेशात हिंसाचार उसळला आहे, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.