माहिती आयोगात प्रकरणांचा वेगवान निपटारा  !

  • छत्रपती संभाजीनगर खंडपिठाची उल्लेखनीय कामगिरी !

  • प्रलंबित द्वितीय अपिलांत ५५ टक्के घट !

छत्रपती संभाजीनगर – राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने प्रकरणांच्या जलद निपटार्‍यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. वर्ष २०२४ मध्ये खंडपिठाद्वारे १४ सहस्र १ द्वितीय अपिले निकाली काढण्यात आली. त्यानंतर वर्ष २०२५ मध्येही १० सहस्र ७८३ द्वितीय अपिलांचा यशस्वी निपटारा केला आहे. आयोगाकडे प्राप्त होणार्‍या तक्रारींच्या निपटार्‍याच्या प्रमाणात जवळपास १० पटीने वाढ झाली असून द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेत अनुमाने ५५ टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. वर्ष २०२४ अखेरीस ८ सहस्र ६९९ द्वितीय अपिले प्रलंबित होती. ती संख्या डिसेंबर २०२५ अखेरीस ३ सहस्र ९४६ इतकी झाली आहेत.

तक्रार निवारणामध्येही सुधारणा दिसून आली आहे. वर्ष २०२४ अखेरीस प्रलंबित असलेल्या १६५ तक्रारी डिसेंबर २०२५ अखेरीस ८५ वर आल्या असून त्यामुळे प्रलंबित तक्रारींमध्ये ५१ टक्के घट झाली आहे. वर्ष २०२५ मध्ये तक्रार निपटार्‍याच्या प्रमाणात १० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या प्रभावी प्रशासकीय नियोजन, सुनावणीतील शिस्त, नियोजनबद्ध कामकाज, तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत आणि पारदर्शक न्याय मिळावा, हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही प्रलंबित प्रकरणे अल्प करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील’, असे राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी सांगितले.