काश्मीरमधील मशिदींविषयी बोलणार्‍या पाकने बलुचिस्तानमध्ये ४० मशिदी उद्ध्वस्त केल्या आहेत !  – Baloch Leader Mir Yar

बलूच नेते मीर यार यांची भारताची बाजू घेऊन पाकवर कठोर टीका

बलूच नेते मीर यार (वर्तुळात)

नवी देहली – पाकिस्तान स्वतःच एक आतंकवादी देश असून त्याने  बलुचिस्तानमध्ये ४० मशिदी उद्ध्वस्त केल्या आहेत. मशिदींवर थेट बाँबफेक करणे, कुराण जाळणे आणि मशिदींच्या प्रमुखांचे अपहरण करणे, असे अमानवीय प्रकार पाकिस्तानी सैन्याने केले आहेत. जो देश स्वतः अल्पसंख्यांकांचा छळ करतो, त्याला दुसर्‍यांना मानवाधिकारावर प्रवचन देण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत बलूच नेते मीर यार यांनी पाकच्या सरकारवर टीका केली आहे.

भारताने काश्मीरमधील मशिदी आणि मदरसे यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याची प्रक्रिया चालू केल्यावर पाकने यावर टीका केली होती. त्याला विरोध करतांना बलोच यांनी पाकला फटकारत भारताची बाजू घेतली.

पाक सैन्याकडून रणगाड्यांद्वारे बाँबफेक करून नागरिकांवर आक्रमण

बलूच नेते मीर यार यांनी ‘एक्स’वर म्हटले की, पाकिस्तानी सैन्याने सर्वांत आधी ‘खान ऑफ कलत’ यांची मशीद लक्ष्य केली होती. पाकिस्तानी रणगाड्यांनी आणि तोफखान्याने नागरिकांवर बाँबफेक केली होती. त्या मशिदीवर आजही मॉर्टर शेलच्या खुणा असून त्या पाकिस्तानच्या क्रौर्याचा आणि इस्लामविरोधी वर्तनाचा जिवंत पुरावा आहेत. पाकिस्तानचे सैन्य धार्मिक आणि जिहादी कट्टरतावाद्यांचा वापर करून हिंदू, शीख, ख्रिस्ती आणि इतर अल्पसंख्यांक यांना घाबरवण्यासाठी शस्त्र म्हणून करते.

संपादकीय भूमिका

अशा पाकला भारतातील मशिदींविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, हे स्पष्ट होते. भारतातील पाकप्रेमी यावर का बोलत नाहीत ?