युवतींना सुरक्षित बनवण्यासाठी दुर्ग (छत्तीसगड) येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज (भोसले घराणे) यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांची विशेष उपस्थिती

डावीकडून सर्वश्री सुदीप सनातनी, नीरज क्षीरसागर, आशिष शर्मा, सुनील घनवट, हिंदुत्वनिष्ठ कमल बिस्वाल, निरंजन चोडणकर आणि संजय साहू

१ सहस्राहून अधिक तरुण-तरुणींना मिळणार नि:शुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षण !

दुर्ग (छत्तीसगड) – सध्याच्या काळात समाजातील असुरक्षितता, गुन्हेगारी प्रवृत्ती, रस्त्यावर होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास, सामाजिक माध्यमांद्वारे होणारा छळ इत्यादी घटनांमुळे युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. प्रत्येक मुलगी सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी असावी, हे आपले सामूहिक दायित्व आहे. या उद्देशाने ‘वैदिक गुरुकुल कल्याण फाऊंडेशन’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने १७ आणि १८ जानेवारी २०२६ या दिवशी पुलगाव, दुर्ग येथे महेश कॉलनी येथील डोम शेड येथे नि:शुल्क ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये असे शिबीर प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते सायं. ७.०० वाजेपर्यंत असणार्‍या या शिबिरात १ सहस्राहून अधिक तरुण-तरुणींना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला वैदिक गुरुकुल कल्याण फाऊंडेशनचे संस्थापक अधिवक्ता आशिष शर्मा, हिंदुत्वनिष्ठ सुदीप सनातनी, हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड समन्वयक नीरज क्षीरसागर आणि हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड अन् महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, हिंदुत्वनिष्ठ कमल बिस्वाल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक निरंजन चोडणकर आणि हिंदुत्वनिष्ठ संजय साहू हे उपस्थित होते.

श्री. घनवट या वेळी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एन्.सी.आर्.बी.च्या) अहवालानुसार गेल्या ३ वर्षांत देशभरात १० लाखांहून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे तरुणी आणि महिला यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. या शिबिरात हिंदु जनजागृती समिती विविध आपत्कालीन परिस्थिती आणि समाजात उद्भवणार्‍या कठीण परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयी प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देईल.’

पत्रकार परिषदेत बोलतांना अधिवक्ता आशिष शर्मा म्हणाले की, दुर्ग येथे अशा प्रकारचे प्रशिक्षण होणे, ही ऐतिहासिक गोष्ट आहे, तसेच काळाची आवश्यकता आहे.

या शिबिरात वैदिक गुरुकुल कल्याण फाऊंडेशन मुख्य आयोजक म्हणून सहभागी होत आहे. गुरुकुलचे विद्यार्थी हिंदु संस्कृतीच्या संवर्धनासाठी कसे कार्य करत आहेत, याचे अनुभव ते सादर करतील.

प्रतिष्ठित मान्यवरांचे मार्गदर्शन

या शिबिराला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, छत्तीसगड सरकारचे कॅबिनेट मंत्री श्री. गजेंद्र यादव, दुर्ग महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती अलका बाघमार, अधिवक्ता आशिष शर्मा आणि  श्री. सुनील घनवट उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. शिबिराच्या समारोप सत्राला नागपूरचे श्रीमंत मुधोजी राजे भोसले (छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज), श्री. प्रबल प्रताप जुदेव आणि पू. अशोक पात्रीकर संबोधित करतील.

शिबिरात सहभागी होण्यास इच्छुक तरुण-तरुणींनी त्यांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी ९२२९५ ७६९०१, ९९९३७ ९९१११, ७७४८०३००० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये

  • ५० हून अधिक अनुभवी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
  • कठीण आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिकार करण्यासाठी व्यावहारिक तंत्रे
  • सर्वांसाठी पूर्णपणे नि:शुल्क प्रशिक्षण
  • कराटे आणि लाठी-काठी प्रशिक्षणाची विशेष व्यवस्था
  • शौर्य जागृत करण्यासाठी क्रांतिकारक आणि थोर पुरुष यांच्या माहितीपर आकर्षक फ्लेक्स प्रदर्शन