Ramayana Every Entrepreneur : ‘प्रत्येक उद्योजकासाठी रामायणातील शिकवण’ पुस्तक प्रकाशित !

प्रसिद्ध लेखक, चित्रपट निर्माते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शंतनू गुप्ता आहेत लेखक !

लेखक श्री. शंतनू गुप्ता व पुस्तकाचे मुखपृष्ठ

नवी देहली : ‘प्रत्येक उद्योजकासाठी रामायणातील शिकवण’ (Teachings from the Ramayana for every entrepreneur) नावाचे इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. प्रसिद्ध लेखक, चित्रपट निर्माते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शंतनू गुप्ता यांनी हे पुस्तक लिहिले आहे. रामायण जीवनातील कुठल्याही आव्हानाचे उत्तर देऊ शकते, हा संदेश श्री. गुप्ता यांनी या पुस्तकाद्वारे दिला आहे. त्यांनी ‘सनातन प्रभात’ला माहिती देतांना सांगितले की, मी उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून वाल्मीकि रामायणाचे वाचन केले आणि हे पुस्तक लिहिले. उद्योजकीय प्रवासाला अधिक उंचीवर नेण्यासाठी रामायणकाळातील शहाणपण पुस्तकातील व्यावहारिक आणि संवादात्मक धड्यांच्या माध्यमातून उद्योजकांना आत्मसात करण्यास साहाय्य करेल. पुस्तकात रामायणातील २५ कथांतून महत्त्वपूर्ण बोध मांडण्यात आले आहेत. यशस्वी होण्यासाठी ‘अर्थपूर्ण भागीदारी कशी विकसित करावी ?’, ‘सचोटीने नेतृत्व कसे करावे ?’ आणि ‘एका चांगल्या मार्गदर्शकाच्या शक्तीचा वापर कसा करावा’, या गोष्टींसाठीही माझे पुस्तक उपयुक्त ठरू शकते.

१० सूत्रांतून जाऊन घ्या पुस्तकाची माहिती !

‘सनातन प्रभात’शी बोलतांना पुस्तकाचे लेखक श्री. शंतनू गुप्ता म्हणाले की,

१. पुस्तकात ‘टाटा’, ‘अ‍ॅपल’ , ‘पेटीएम्’पासून ‘फ्लिपकार्ट’पर्यंत प्रस्थापित व्यवसाय आणि ‘स्टार्टअप्स’ (नूतन व्यवसाय) यांविषयीच्या २५ ‘केस स्टडीज’ (अभ्यासनीय घटना) समाविष्ट आहेत. यांमध्ये व्यवसायातील आव्हाने सोडवण्याचा ‘रामायण मार्ग’ सांगण्यात आला आहे.

२. कोणत्याही उद्योगाचे अंतिम ध्येय नफा मिळवणे हेच असते आणि ते योग्यच आहे, किंबहुना भारतीय शास्त्रानुसार ‘अर्थ’ (पैसा मिळवणे) हे जीवनातील वैध उद्दिष्टांपैकी एक आहे; परंतु अर्थार्जन हे ‘धर्मा’ने (नीतीमत्तेने) केले पाहिजे.

३. आजच्या युगात ‘कॉर्पोरेट एथिक्स’ (व्यावसायिक नैतिकता) आणि ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (व्यावसायिक सामाजिक दायित्व) या संकल्पना ‘धर्मा’ला ‘अर्थ’ मिळवण्याच्या याच विचाराला अधोरेखित करतात.

४. रामायणाचा एक विद्यार्थी म्हणून माझा असा ठाम विश्‍वास आहे की, आपल्या कामाच्या ठिकाणी येणार्‍या जवळपास प्रत्येक परिस्थितीवर हे महाकाव्य एक नैतिक उत्तर प्रदान करते.

५. प्रभु श्रीरामाने जिद्द आणि दृढ निश्‍चय यांच्या बळावर आपली १४ वर्षे वनवासात घालवली. या काळात त्याने अशा आव्हानांचा सामना केला, जी कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत कठीण असू शकतात.

६. या वनवास काळात श्रीरामावर त्याचे राज्य, पत्नी आणि अगदी स्वतःचा जीवही गमावण्याची वेळ आली होती; पण काहीही झाले, तरी त्याने कुठलाही चुकीचा मार्ग स्वीकारला नाही, ना साहाय्यासाठी आपला भाऊ भरत याच्याकडे धाव घेतली आणि ना आपली प्रामाणिकता, चांगुलपणा अथवा धार्मिकता यांचा त्याग केला.

७. सीतेच्या अपहरणाच्या प्रारंभीच्या आघातानंतर त्याने स्वतःला शांत केले. त्याने आयुष्यात विविध गुरूंनी शिकवलेल्या सर्व कौशल्यांचा वापर केला. उपलब्ध संसाधनांच्या आधारे त्याने रणनीती आखली.

८. रामायणात अशी अनेक पात्रे आहेत, ज्यांनी उपलब्ध पर्यायांतून अतिशय शहाणपणाचे निर्णय घेतले, तर काहींनी चुकीची निवड केली. आपण या दोघांकडूनही बरेच काही शिकू शकतो आणि आयुष्यासाठी स्वतःची एक सशक्त निर्णयप्रक्रिया विकसित करू शकतो.

९. हे पुस्तक म्हणजे रामायणातील नेतृत्वाचे धडे आजच्या काळाच्या संदर्भात मांडण्याचा एक प्रयत्न आहे.

१०. वाल्मीकि रामायणातील २४ सहस्र श्‍लोकांपैकी प्रत्येक श्‍लोकात एक संदेश दडलेला आहे, जो मानवजातीला अभूतपूर्व स्तरावर समृद्ध करू शकतो.

पुस्तक खरेदी कसे कराल ?

‘अ‍ॅमेझॉन’वरून हे पुस्तक आपण खरेदी करू शकता. त्यासाठी खालील लिंकला भेट द्या :

https://www.amazon.in/Teachings-Ramayana-Every-Entrepreneur-Partnerships/dp/0143473778

पृष्ठ संख्या : २२०
मूल्य : रु. २७३

संपादकीय भूमिका

धर्मशिक्षणाचा अभाव असलेले हिंदू आज जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी चाचपडत आहेत. देशाला आर्थिकदृष्ट्या ‘विकसित भारत’ करण्यासाठी लक्षावधी हिंदु उद्योजक कार्य करत असतांना त्यांच्यात धर्मदृष्टी विकसित होणे अत्यावश्यक आहे. श्री. शंतनू गुप्ता यांचे हे पुस्तक त्या दिशेने मार्गदर्शनपर ठरणार आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन !