कोल्हापूरची हद्दवाढ करण्यासह शहराचा सर्वांगिण विकास करू ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘देवाभाऊंसोबत मिसळ’ या विशेष कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, १२ जानेवारी (वार्ता.) : यापूर्वीचे लोकप्रतिनिधी शहराची हद्दवाढ करण्यासाठी सकारात्मक नव्हते; मात्र आता परिस्थिती तशी नाही. शहराचा विकास होण्यासाठी हद्दवाढ अत्यावश्यक आहे. त्यामुळे येणार्‍या काळात कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासमवेत, सांगली-कोल्हापूर दोन्ही शहरांना महापुरापासून मुक्ती, पंचगंगा नदीप्रदूषण पूर्णपणे थांबवणे यांसह शहराचा सर्वांगिण विकास करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. निवडणुकीच्या निमित्ताने ‘देवाभाऊंसोबत मिसळ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘बी न्यूज’चे संपादक चारुदत्त जोशी, ‘युथ आयकॉन’ कृष्णराज महाडिक आणि अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना त्यांनी ही ग्वाही दिली.

१. जे निवडून आल्यावर ‘जनतेचे सेवक’ म्हणून काम करतील, अशीच माणसे आपण नगरसेवक म्हणून निवडून दिली पाहिजेत. एखादे शहर चांगले करण्यासाठी नागरिक आणि लोकप्रतिनिधी अशा दोघांचीही इच्छाशक्ती हवी.

सामान्य माणसाचा आवाज पोचवण्याचे सामर्थ्य सामाजिक माध्यमांमध्ये !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामाजिक माध्यम याची आज आत्यंतिक आवश्यकता असून सामान्य माणसाचा आवाज पोचवण्याचे सामर्थ्य सामाजिक माध्यमांमध्ये आहे. मला जेव्हा वेळ असेल, तेव्हा या माध्यमांद्वारेच मला नवीन माहिती, समस्या कळतात. सामाजिक माध्यमांमुळे नव्या पिढीच्या विचारांना आणि सर्जनशीलतेला तिथे चांगली दिशा मिळते.

२. पंचगंगा नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी मोठे काम आम्ही हाती घेतले असून येणार्‍या २/३ वर्षांत ते पूर्ण होईल. सांगली-कोल्हापूर येथील महापूर हटवण्यासाठी ३ सहस्र कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम चालू असून वाहून जाणारे ३०-३५ टी.एम्.सी. पाणी उजनी येथे नेऊन ते दुष्काळी भागातील विदर्भ-मराठवाडा येथे नेण्यात येईल.