SriLankan MP Namal Rajapaksa : दक्षिण आशियात शांतता आणि स्थैर्य यांसाठी भारताच्या नेतृत्वाची विशेष आवश्यकता !

श्रीलंकेचे खासदार नमल राजपक्षे यांचे विधान

नमल राजपक्षे

कोलंबो (श्रीलंका) : दक्षिण आशियामध्ये दीर्घकाळ शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी भारतीय नेतृत्वाची विशेष आवश्यकता आहे, असे मत श्रीलंकेचे खासदार नमल राजपक्षे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मांडले. पालटत्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षाविषयीच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियामध्ये भक्कम प्रादेशिक सहकार्याची वाढती आणि तातडीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रक्रियेत भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

हे विधान अशा काळात समोर आले आहे की, जेव्हा दक्षिण आशियासह संपूर्ण जग अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे.

जागतिक दक्षिणेत भारताचे नेतृत्व केंद्रस्थानी

राजपक्षे यांनी सांगितले की,

अलीकडच्या वर्षांत बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांनी राजकीय अस्थिरतेचे टप्पे अनुभवले आहेत. या काळात अनेकदा घडलेल्या गोंधळाला टोकाच्या विचारसरणीच्या घटकांनी पाठबळ दिले. अशा परिस्थितीत या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, आतंकवादाचा सामना करण्यासाठी, राजकीय हिंसाचार रोखण्यासाठी आणि अल्पसंख्याांकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक आहे.

दक्षिण आशियामध्ये दीर्घकाळ शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी प्रादेशिक एकता अत्यंत महत्त्वाची असून या संदर्भात भारताचे नेतृत्व केंद्रस्थानी आहे, या सूत्रावर त्यांनी भर दिला. भारतीय नेतृत्वाखाली विकास आणि स्थैर्य यांवर आधारित समान उद्दिष्टांसह दक्षिण आशिया एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी नमूद केले. बांगलादेश आणि नेपाळ येथील आगामी निवडणुका मुक्त अन् निष्पक्ष पद्धतीने पार पडल्यास लोकशाही वैधतेची पुष्टी होईल आणि त्यामुळे प्रादेशिक सुरक्षेला अधिक बळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

भारत या अपेक्षेस पात्र आहे ! येणार्‍या काळात भारत सर्वच क्षेत्रांत स्वयंपूर्ण आणि सुसज्ज झाल्यास तो केवळ दक्षिण आशियाच काय, अख्ख्या जगाचे नेतृत्व करील, हे निश्चित ! त्यासाठी भारतीय शासनकर्त्यांनी आतापासूनच दूरदृष्टीने निर्णय घेऊन त्याप्रमाणे पावले उचलणे आवश्यक !