दुर्दैवाने आपले शेजारी वाईट आहेत ! – Foreign Minister Dr. S. Jaishankar

डॉ. एस्. जयशंकर

चेन्नई (तमिळनाडू) –  शेजारी चांगले आणि वाईटही असू शकतात. दुर्दैवाने आमचे शेजारी वाईट आहेत. जर एखादा देश जाणूनबुजून, सातत्याने आणि पश्चात्ताप न करता आतंकवाद चालू ठेवण्याचा निर्णय घेत असेल, तर आम्हाला आमच्या लोकांना आतंकवादापासून वाचवण्याचा अधिकार आहे, असे विधान परराष्ट्रमंत्री डॉ.एस्. जयशंकर यांनी येथे केले. ते आयआयटी मद्रास येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल, ते आम्ही करू !

परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी आम्ही पाणी वाटपाच्या व्यवस्थेवर सहमती दर्शवली होती; परंतु जर अनेक दशके शेजारी देश आतंकवादी कारवाया चालू ठेवत असेल, तर चांगले शेजारी होऊन रहाण्यात काही अर्थ नाही. ‘‘आम्ही अधिकाराचा वापर कसा करू ?’, हे आमच्यावर अवलंबून आहे. सिंधु जल वाटप कराराच्या सूत्रावर बोलतांना ते म्हणाले ‘आम्ही काय करावे किंवा काय करू नये ?’, हे कुणीही आम्हाला सांगू शकत नाही. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल, ते आम्ही करू.’

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग !

डॉ. जयशंकर यांनी या वेळी शांघाय विमानतळावर चिनी पारपत्र अधिकार्‍यांनी अरुणाचल प्रदेशातील एका महिलेला त्रास दिल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. आम्ही अशा घटनांचा निषेध केला आणि आम्ही हेही स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या कृती केल्याने खरे तर काहीही पालटणार नाही.