Honour “Natham Kanavai War” : राज्यात स्टॅन स्वामीचा शिलालेख उभारता येत असेल, तर नाथम कनवाई युद्धाचे स्मारकही उभारता येईल !

मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. आर. स्वामीनाथन् यांनी वर्ष १७५५ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात झालेल्या नाथम कनवाई युद्धाच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यास संमती दिली. त्या संदर्भात त्यांनी म्हटले की, जर राज्यात स्टॅन स्वामी याच्या स्मरणार्थ शिलालेख उभारता येत असेल आणि त्यासाठी कोणत्याही विशेष अनुमतीची आवश्यकता भासली नसेल, तर नथम कनवाई युद्धाच्या स्मरणार्थ उभारल्या जाणार्‍या स्तूपासाठीही स्वतंत्र अनुमतीची आवश्यकता नसावी.

ऐतिहासिक संघर्षांची स्मृती जपणे समाजासाठी आवश्यक ! – उच्च न्यायालय

न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांनी सुनावणीच्या वेळी तीव्र खेद व्यक्त केला की, आजच्या पिढीला भारतातील परकीय सत्तेच्या काळाचा इतिहास ठाऊक नाही, तसेच स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षांची जाणीवही लोकांना अल्प आहे. अशा ऐतिहासिक संघर्षांची स्मृती जपणे समाजासाठी आवश्यक आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांना त्यांच्या भूतकाळातील घटनांची जाणीव राहील.

काय आहे प्रकरण ?

तमिळनाडूतील नथम कनवाई येथे वर्ष १७५५ मध्ये ब्रिटीश सैन्य आणि स्थानिक मेलूर कल्लर समाज यांच्यात तीव्र लढाई झाली होती. या युद्धाच्या स्मरणार्थ एक स्मारक स्तूप उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता; परंतु नथम येथील तहसीलदारांनी त्यास अनुमती नाकारली. त्यानंतर अर्जदाराने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. या याचिकेवरील सुनावणीत न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् यांनी तहसीलदारांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आणि स्मारक उभारण्यासाठी मार्ग मोकळा केला.

कोण आहे स्टॅन स्वामी ?

स्टॅन स्वामी हा जेसुइट पाद्री आणि आदिवासी लोकांच्या अधिकारांसाठी काम करणारा कार्यकर्ता होता. भीमा कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवादाशी त्याचे नाव जोडले गेले होते. वर्ष २०२१ मध्ये त्याचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ स्मृतीस्तंभ उभारण्यास मद्रास उच्च न्यायालयाने अनुमती दिली होती.

नथम कनवाई युद्धात काय घडले ?

याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, मेलूर कल्लर समाज आणि ब्रिटीश सैन्य यांच्यातील लढाईत कल्लर समाजाने ब्रिटीश सैन्याचा पराभव केला. हा संघर्ष कोइलकुडी येथील तिरुमोगूर मंदिराशी संबंधित होता. कर्नल अलेक्झांडर हेरॉन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सैन्याने मंदिरातील पितळी मूर्ती आणि मौल्यवान वस्तू लुटल्या. त्यानंतर कल्लर समाजाने संघटित होऊन लढा दिला आणि लुटलेल्या मूर्ती परत मिळवल्या.