India Pakistan Conflict : आतंकवादी कारवायांमुळे वर्ष २०२६ मध्ये भारत-पाक यांच्यात पुन्हा युद्ध होण्याची शक्यता – ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’

अमेरिकी संस्थेचा दावा

वॉशिंग्टन (अमेरिका) – वर्ष २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध होऊ शकते, असा दावा अमेरिकेच्या ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ या संस्थेने केला आहे. या संस्थेच्या ‘कॉन्फ्लिक्ट्स टू वॉच इन २०२६’ या अहवालानुसार काश्मीरमधील आतंकवादी कारवाया वाढल्याने दोन्ही देशांमध्ये संघर्षाची मध्यम शक्यता आहे.

जम्मूमध्ये ३० पाकिस्तानी आतंकवादी सक्रीय

या अहवालात म्हटले आहे की, जर भारत-पाक यांच्यात संघर्ष झाला, तर त्याचा अमेरिकेच्या हितांवरही मध्यम स्तरापर्यंत परिणाम होऊ शकतो. जरी जम्मू-काश्मीरमध्ये अद्याप कोणतेही मोठे आतंकवादी आक्रमण झाले नसले, तरी गुप्तचर संस्थांनुसार  जम्मूमध्ये ३० हून अधिक पाकिस्तानी आतंकवादी सक्रीय आहेत.

भारत-पाक यांच्याकडून सैनिकी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न

भारतातील संरक्षण अधिग्रहण परिषदेने अलीकडेच ७९ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण करारांना संमती दिली आहे, ज्यात ड्रोन, एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे आणि लक्ष्यित बाँब यांचा समावेश आहे.

दुसरीकडे पाकिस्ताननेही तुर्कीये आणि चीन यांच्याकडून नवीन ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी चर्चा चालू केली आहे, जेणेकरून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळेची कमतरता दूर करता येतील.

अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षाचीही शक्यता

या अहवालात वर्ष २०२६ मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्षाची मध्यम शक्यता असल्याचाही दावा करण्यात आला आहे. तथापि याचा अमेरिकेच्या हितांवर अल्प परिणाम होईल, असेही स्पष्ट केले आहे.