Aligarh Loudspeakers : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे मशिदींवर लावलेल्या भोंग्यांच्या मोठ्या आवाजाच्या विरोधात आंदोलन झाले. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत भोंगे हटवण्याची मागणी केली. निदर्शकांचे म्हणणे आहे की, भोंग्यांच्या मोठ्या आवाजामुळे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना त्रास होतो आणि त्यांची एकाग्रता बिघडते. त्यामुळे आवाजावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून भोंगे काढावेत, अशी त्यांची भूमिका आहे.

संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रपतींच्या नावाने एक निवेदन सादर केले. मागणी मान्य न झाल्यास ते स्वतः भोंगे हटवण्यास बाध्य होतील, अशी चेतावणीही देण्यात आली.

ए.आय.एम्.आय.एम्.कडून विरोध !

यामीन अब्बासी

ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षाचे नेते यामीन अब्बासी यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर कारवाईची मागणी केली. ‘काही जण नमाज, मंदिर आणि मशीद यांवरून विधान करून देशात तणाव निर्माण करत आहेत’, असा आरोप त्यांनी केला. ‘असे प्रकार प्रतिदिन घडत असून ते सहन केले जाणार नाहीत’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. (‘चोर तर चोर, वर शिरजोर’ या मनोवृत्तीचे यामीन अब्बासी ! – संपादक)

अब्बासी म्हणाले की, नमाजाच्या आवाजामुळे कुणाला त्रास होऊ नये. (पण होत आहे, त्यामुळेच त्याला विरोध केला जात आहे ! – संपादक) मशिदींच्या आवाजापेक्षा अधिक मोठ्या आवाजात कावड यात्रा आणि मंदिर यांमधून घोषवाक्ये दिली जातात, तरीही आम्ही आक्षेप घेत नाही. (जर असे असेल, तर नियमानुसार आक्षेप घेण्यास कुणीही रोखलेले नाही ! – संपादक) अराजकता निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना तुरुंगात डांबावे, अशी मागणी त्यांनी केली. (या देशात अराजकसदृश स्थिती कोण निर्माण करत आहे, हे सर्वश्रूत आहे ! – संपादक) सरकार अशा लोकांना पुढे करत असल्याचाही त्यांनी आरोप केला. राज्यघटनेने दिलेले अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात गेल्या काही वर्षांपासूनच मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात वाजवण्यात येणार्‍या भोंग्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातही अलीगड येथील भोंग्यांवर कारवाई होत नसेल, तर पोलिसांनी याची नोंद घेत कारवाई करणे आवश्यक आहे !