उत्तरप्रदेश : मुलांवर संस्कार न केल्याचे कारण देत पोलिसांकडून ४ वासनांध मुलांच्या मातांना अटक !

  • ४ मुलांनी मुलीची छेड काढल्याचे प्रकरण

  • चारही मुले अल्पसंख्य समाजातील

  • मुलांच्या वडिलांनाही अटक करणार असल्याची पोलिसांनी माहिती

प्रतिकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बदायू जिल्ह्यातील बुदौन शहरात ४ अल्पवयीन मुलांनी इयत्ता आठवीतील एका मुलीची छेड काढणे, तिच्यावर अश्लील शेरेबाजी करणे आदी कृत्ये केल्याच्या कारणामुळे त्यांच्या मातांना अटक करण्यात आली आहे. भारतीय न्याय संस्थेच्या प्रतिबंधात्मक कलमांच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या मुलांवर योग्य संस्कार न केल्यामुळे त्यांच्या पालकांना उत्तरदायी धरून ही अटक करण्यात आहे, असे पोलिसांना सांगितले.

१. संबंधित ४ मुले ही शाळेच्या वाटेवर थांबून अश्लील शेरे मारत असल्याची तक्रार पीडित मुलीने तिच्या वडिलांकडे केली होती.

२. काही दिवसांनी मुलीच्या कुटुंबियांनी उशैत पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर मुलांवर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

३. पोलीस ठाण्याचे प्रमुख अजय पाल सिंह यांनी सांगितले, ‘ही चारही मुले शाळेत जात नसत आणि शाळेच्या परिसरात घुटमळत असत. मुले १३ वर्षांखालील असून ती  अल्पसंख्य समाजातील आहेत.’ (वासनांध अल्पसंख्य ! – संपादक)

४. ‘या मुलांनी पीडित मुलीची अनेकदा छेड काढली. मुले बेशिस्त आहेत आणि परिसरात वाईट कृत्यांसाठी ओळखली जातात. मुलांचे संगोपन आणि त्यांना शिस्त लावण्याचे दायित्व हे पालकांचे असते’, हा स्पष्ट संदेश पालकांपर्यंत पोचवण्यासाठी या मुलांच्या मातांवर कारवाई करण्यात आली’, अशी माहिती सिंह यांनी दिली.

५. ही अटक करण्याच्या आधी मुलांच्या घरी या प्रकरणाशी संबंधीत नोटीसही पाठवण्यात आली होती. सिंह यांनी पुढे स्पष्ट केले की, अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंदवल्यावर अशा प्रकरणात पालकांना नोटीस पाठवली जाते.

६. या चारही मुलांचे वडील उत्तरप्रदेशाच्या बाहेर नोकरी करतात. ते घरी परतल्यानंतर त्यांनाही अटक केली जाईल, असेही सिंह यांनी सांगितले.

७. या ४ महिलांना अटक केल्यानंतर त्याच दिवशी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तिथे वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी घतेलेला स्तुत्य निर्णय ! मुलांचे संगोपन आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याचे दायित्व हे पालकांचे आहे. मुलांना लहान वयापासून मुलींचा आदर करणे आणि त्यांच्याशी सभ्यतेने वागण्याची शिकवण पालकांनी मुलांना दिल्यास महिलांवर अत्याचारांचे गुन्हे अल्प होण्यास साहाय्य होईल !