Jaishankar On Modi : मी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करत आहे !’ – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

भारत हा मुत्सद्देगिरीचा वारसा लाभलेला देश; श्रीकृष्ण आणि हनुमान हेच आमचे आदर्श !

डॉ. एस्. जयशंकर

पुणे – देशाची ओळख ही त्याच्या नेतृत्वाने होत असते. ज्याप्रमाणे हनुमान प्रभु श्रीरामाची सेवा करत होते, त्याचप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी हेच आज देशाची दृष्टी, आत्मविश्वास आणि नेतृत्व आहेत, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी व्यक्त केले. पुणे येथील ‘सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’च्या २२ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी त्यांना एकाने प्रश्न विचारला, ‘भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी केवळ एक डॉ. एस्. जयशंकर पुरेसे आहेत का ?’ त्यावर उत्तर देतांना त्यांनी वरील विधान केले.

उपस्थितांना संबोधित करतांना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, खरेतर तुम्ही तुमचा प्रश्न दुरुस्त करायला हवा. तुम्ही मला विचारण्यापेक्षा ‘एकच मोदी पुरेसे आहेत का ?’, असे विचारायला हवे; कारण नेत्याच्या संकल्पनेनुसारच देश कार्य करत असतो.

पुराणातील मुत्सद्देगिरीचे विश्लेषण !

डॉ. जयशंकर यांनी त्यांच्या भाषणात रामायण आणि महाभारत यांतील प्रसंगांचा दाखला देत भारतीय राजनैतिक कौशल्याचे महत्त्व विशद केले.

ते म्हणाले की,

१. रामायणात हनुमानाची भूमिका एका आदर्श दूताची होती. लंकादहनापूर्वी त्यांनी केवळ सीतामातेचा शोध घेतला नाही, तर शत्रूची (रावणाची) शक्ती किती आहे ? याचेही सूक्ष्म निरीक्षण केले.

२. हनुमानाने बिभीषणाला ओळखून ‘तो चुकीच्या पक्षात आहे’, हे हेरले. त्याला आपल्या बाजूला कसे वळवता येईल, याचा अचूक कयास लावला. हीच खरी मुत्सद्देगिरी आहे.

३. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने ज्या प्रकारे शिष्टाई आणि रणनीती आखली, तोच वारसा आजही भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रेरणा देणारा आहे.