PSBs Loan Waiver : गेल्या साडेपाच वर्षांत सार्वजनिक बँकांकडून ६ लाख कोटी कर्ज माफ

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

नवी देहली : रिझर्व्ह बँकेच्या आकडेवाडीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६ लाख १५ सहस्र ६४७ कोटी रुपयांची एकत्रित कर्ज रक्कम गेल्या साडेपाच वर्षांत माफ केली, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. या बँकांनी १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत भाग आणि कर्जरोखे यांद्वारे बाजारातून १ लाख ७९ सहस्र कोटी रुपये भांडवल उभारल्याचेही मंत्री चौधरी यांनी सांगितले. २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२५ पर्यंत गेल्या साडेचार वर्षांत ३ सहस्र ५८८ कोटी २२ लाख रुपयांच्या फसवणुकीचे ५ लाख ८३ सहस्र २९१ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी २३८ कोटी ८३ लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती मंत्री चौधरी यांनी दिली.