राज्यात वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याची अंतिम मुदतवाढ ३१ डिसेंबरपर्यंत !

आतापर्यंत ५ वेळा मुदतवाढ !

प्रतीकात्मक चित्र

पुणे – न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात वर्ष २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एच्.एस्.आर्.पी.) पाटी बसवणे बंधनकारक आहे. हे काम एका आस्थापनाला देण्यात आले आहे. पुण्यात २५ लाखांपेक्षा अधिक वाहनांना ही पाटी बसवावी लागणार आहे. आतापर्यंत फक्त ७ लाख वाहनांनाच ही पाटी बसवण्यात आली आहे. वाहनसंख्या आणि पाटी सिद्ध करून ती बसवण्यास लागणारा कालावधी अधिक असल्याने पाटी बसवून घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार राज्य परिवहन विभागाने ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ बसवण्यासाठी एक महिन्याची म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीनंतर ही पाटी नसलेल्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

राज्य परिवहन विभागाने वाहनांना ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट’ लावण्यासाठी आतापर्यंत ५ वेळा मुदतवाढ दिली आहे. पुणे शहरातील अनुमाने ३० टक्के वाहनांनी याचा लाभ घेतला आहे.

वाहनधारकांचा अपुरा प्रतिसाद, ऑनलाईन नोंदणीत येणार्‍या तांत्रिक अडचणी, विलंबाने मिळणार्‍या पाट्या, केंद्रचालक वाहनधारकांकडून अतिरिक्त रक्कम घेणे आदी कारणांचा परिणाम क्रमांक पाटी लावण्यावर दिसून येतो. (आतापर्यंत यावर उपाययोजना का काढली गेली नाही ? याविषयी उत्तरदायींना खडसावणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

१ महिन्यात तरी वाहनांवर पाटी बसवली जाणार का ?