Shankhnad Mahotsav Delhi : संस्कृती आणि इतिहास यांच्या पुनरुज्जीवनासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने झारखंडमधील धनबाद येथे पत्रकार परिषद

डावीकडून सुनील कुमार, डॉ. नील माधव दास, शंभू गवारे, सौरभ कुमार

धनबाद (झारखंड) – देहली येथे होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये भारताला ‘सनातन राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली जाणार आहे. सनातन राष्ट्र घोषित झाल्यावरच हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील आक्रमणे रोखता येतील. सनातन राष्ट्राची निर्मिती करून आपल्याला सनातन संस्कृती आणि तेजस्वी इतिहास यांचे पुनरुज्जीवन करायचे आहे, असे वक्तव्य ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले. देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाच्या निमित्ताने २९ नोव्हेंबर या दिवशी झारखंडमधील धनबाद येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विश्व हिंदु परिषदेचे श्री. सुनील कुमार, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक, श्री. शंभू गवारे आणि ‘आर्य समाजा’चे झारखंड राज्याचे उपदेशक सहप्रवक्ते श्री. सौरभ कुमार उपस्थित होते.

या वेळी डॉ. नील माधव दास म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र घोषित झाल्यावर भारतात होणार्‍या दंगली आणि स्फोट थांबतील, तसेच भारताची आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती वेगाने होऊ शकेल. महोत्सवामध्ये केंद्र आणि देहली शासनाचे मंत्रीही सहभागी होणार आहेत.’’

हिंदु राष्ट्राच्या सूत्राने भारलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी महोत्सवात सहभागी व्हावे ! – सुनील कुमार, जिल्हा महामंत्री, विश्व हिंदु परिषद

आपल्या राष्ट्रपुरुषांनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्याची वेळ आली आहे. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असलेले अनेक हिंदुत्वनिष्ठ एकत्र येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार महोत्सवामध्ये आणली जाणार आहे, तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांना बांधण्यात आलेल्या बेड्याही महोत्सवातील प्रदर्शनामध्ये असणार आहेत. आपला महान इतिहास युवकांना शिकवला गेला नाही. असा तेजस्वी इतिहास पुन्हा सर्वांसमोर आणण्याचे कार्य महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे समस्त हिंदूंनी या महोत्सवात सहभागी व्हावे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एक व्हायचे आहे ! – सौरभ कुमार, राज्य उपदेशक सहप्रवक्ते, आर्य समाज, झारखंड  

योग्य व्यक्तीच्या हातात सत्ता आल्यामुळेच अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर होऊ शकले, त्याप्रमाणे चांगल्या व्यक्ती एकत्रित आल्यास चांगले साध्य होऊ शकेल. भारताची परंपरा वैभवशाली आहे. प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, तसेच थोर ऋषिमुनी यांचे आपण वंशज आहोत; मात्र जात आणि पक्ष यांमध्ये आपण विभागलो गेलो. भारताचे अनेक तुकड्यांमध्ये विभाजन झाले; परंतु आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला एक व्हायचे आहे. समस्त हिंदूंना एकत्रित घेऊनच आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.

धर्मध्वज फडकला असून लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘सनातन संस्कृतीचा गौरव आणि भारताची आंतरिक सुरक्षा’ आदी विषयांवर या महोत्सवात चर्चा होणार आहे. केंद्रीयमंत्री गजेंद्र शेखावत, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि आदी महनीय व्यक्ती महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. भारत हिंदूबहुल आहे. बहुसंख्य हिंदू असलेले राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ असावे, ही मागणी राज्यघटनात्मक आहे. काही वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ याविषयी चर्चाही होत नव्हती; मात्र सद्य:स्थितीत हिंदु राष्ट्रासाठी सर्व हिंदू एकवटत आहेत. अयोध्येमध्येही श्रीराममंदिरावर धर्मध्वज फडकला आहे. आता लवकरच हिंदु राष्ट्राचीही स्थापना होईल. त्यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.