पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या निलंबनासाठी शहापूर पोलीस ठाण्यासमोर एकदिवसाचे उपोषण !

बालिका अत्याचार प्रकरणात तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण !

आंदोलन करतांना शहापूर ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २६ नोव्हेंबर – दुकानात आलेल्या ६ वर्षीय हिंदु बालिकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी तक्रार घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या निलंबनासाठी शहापूर पोलीस ठाण्यासमोर  ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २६ नोव्हेंबरला एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे आमदार श्री. राहुल आवाडे, श्री. शिवजी व्यास, सुजित कांबळे, प्रवीण सावंत, किसन शिंदे, दादा भाटले, रणजित अनुसे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (हिंदुत्वनिष्ठांनी वारंवार आंदोलन करूनही पोलीस प्रशासन दाद देत नाही. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे शासन आले; मात्र प्रशासकीय अधिकारी अजून जुन्याच सरकारच्या मानसिकतेमधील आहेत, असेच म्हणावे लागेल ! सत्ताधारी पक्षातील आमदारांना पोलीस निरीक्षकांवर कारवाई होण्यासाठी उपोषणास बसावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते काय ? या संदर्भात गृहमंत्री म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

१. ६ वर्षीय हिंदु बालिकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी धर्मांध बाबासाहेब बाणदार (वय ५८ वर्षे) यांना अटक केली आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि आमदार श्री. राहुल आवाडे यांनी मोर्चा काढून ‘२ दिवसांत कारवाई करा’, अशी मागणी केली होती.

२. ग्रामस्थांच्या भावना तीव्र असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी लाक्षणिक ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. या संदर्भात २५ नोव्हेंबरला हिंदुत्वनिष्ठ आणि पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड यांच्यात झालेल्या चर्चेत काहीच निष्पन्न झाले नाही.

३. वरिष्ठ पातळीवरून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने २६ नोव्हेंबरला अखेरीस लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

४. या प्रसंगी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून ‘पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन चालूच राहील’, असे सांगितले आहे.

संपादकीय भूमिका 

सत्ताधारी पक्षातील आमदारांना पोलीस निरीक्षकांवर कारवाई होण्यासाठी उपोषणास बसावे लागते, असे केवळ भारतातच घडते !