राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाकडून आरोप निश्चित !

  • दाऊदच्या मालमत्तेशी संबंधित असलेले ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरण

  • मुंबई सत्र न्यायालय विशेष न्यायालयाचा निर्णय

(‘मनी लाँडरिंग’ म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची प्रक्रिया)

डावीकडे नवाब मलिक

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एम्.पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणी १९ डिसेंबर या दिवशी पुढील सुनावणी होणार असून तेव्हा त्यांना शिक्षा ठोठावली जाण्याची शक्यता आहे. जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित हे मनी लाँड्रिंगचे प्रकरण आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना वर्ष २००२ मध्ये अटक झाली होती. सध्या नवाब मलिक जामिनावर बाहेर आहेत. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, वर्ष १९९३ च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांच्यावर त्यांनी गोवावाला कम्पाऊंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची ३ एकर भूमी कट रचून बळकावल्याचा आरोप होता.

१. सुनावणीच्या वेळी नवाब मलिक यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. या याचिकेवरील मागील सुनावणीच्या वेळी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ‘आरोपी पक्षाला या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे प्रदान करतील आणि तोपर्यंत आरोप निश्चित केले जाणार नाहीत’, असे न्यायालयाला सांगितले होते; मात्र न्यायालयाने खेद व्यक्त करत म्हटले की, माझ्या खंडपिठाच्या वतीने कुणी असे विधान कसे करू शकते ? हे योग्य नाही.

२. आरोपीच्या अधिवक्त्यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय घोषित होईपर्यंत किंवा सरकारी अधिवक्ता निवेदन देईपर्यंत आरोप निश्चित करणे पुढे ढकलण्याची विनंती केली; मात्र सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कठोरपणे म्हटले की, कोणत्याही प्रकरणात ४ आठवड्यांच्या आत आरोप निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.