कोल्हापूर येथे ‘शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन’ कालावधीत विद्यार्थी आणि युवक यांसाठी स्पर्धांचे आयोजन !

५ सहस्र नागरिकांकडून प्रदर्शनास भेट !

शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाच्या संदर्भात आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि विविध विभागांचे अधिकारी

कोल्हापूर, ३० ऑक्टोबर – शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनास २ दिवसांत ५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. हे प्रदर्शन पुढील ८ महिने नागरिकांना पहाण्यासाठी खुले असून या कालावधीत शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा अन् उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यात वक्तृत्व, निबंधलेखन आणि अनुभव लेखन या स्पर्धांचा समावेश असेल. या माध्यमातून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, शौर्य आणि ऐतिहासिक वारसा यांची ओळख करून देणे, हा उद्देश आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रदर्शनासाठी करण्यात आलेल्या सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला आणि त्यात या उपक्रमांविषयी सूचना दिल्या.

विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ‘माझा अनुभव’ या स्वरूपात लेखन सादर करायचे आहे. ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिलेल्या १२ गडांच्या अनुषंगाने निबंध लिहायचे आहेत. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी जाणिवा निर्माण करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाद्वारे करण्यात येतील. शिक्षण विभागाला जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये यांना समाविष्ट करून प्रतिदिन नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हे प्रदर्शन प्रतिदिन सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत खुले असून प्रत्येक सोमवारी प्रदर्शन बंद रहाणार आहे. सुरक्षा आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण लक्षात घेऊन नागरिकांना प्रदर्शनस्थळी कक्षात भ्रमणभाष घेऊन जाण्यास अनुमती दिली जाणार नाही.