मतदारसूचीत सुधारणा होईपर्यंत निवडणुका घेऊ नका ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद !

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

मुंबई – निवडणूक सूचीमध्ये घोळ आहेत. हे घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींपुढे ठेवलेले आहेत. त्यामध्ये सुधारणा करून विरोधी आणि सत्ताधारी पक्ष यांचे समाधान झाले पाहिजे. मतदारसूचीत सुधारणा होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली.

निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी महाविकास आघाडीच्या विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. ‘मतदान गोपनीय असते; परंतु मतदार कसा गोपनीय असेल ? मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावले जातात आणि त्यातील फुटेज ४५ दिवसांनंतर काढले जाते. हे चित्रीकरण निवडणूक आयोग पाहू शकतो, तर जनता का पाहू शकत नाही ? निवडणूक आयोग लपवाछपवी का करतो ? असा प्रश्न या वेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘निवडणूक आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आमचे समाधान झाले नाही. येत्या काळात चुकीच्या मतदार सूचींद्वारे निवडणूक होणार असेल, तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे’, असे म्हटले. जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.