निवडणुकीच्या अधिसूचनेपर्यंत पात्र उमेदवारांना मतदानाचा हक्क मिळावा !

मविआ आणि मनसे नेत्यांनी पुन्हा घेतली निवडणूक आयुक्तांची भेट !

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या नेत्यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी पुन्हा राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलैपर्यंतची मतदारसूची वापरणार असल्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले आहे; परंतु या सूचीत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे त्रुटी दूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना निघेपर्यंत जे मतदानासाठी पात्र होतील, त्यांचा मतदारसूचीत समावेश करावा, अशी मागणी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली.

याविषयीचे निवेदन त्यांनी आयुक्तांकडे दिले. या वेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांसह अन्य नेते उपस्थित होते.

या नेत्यांनी १४ ऑक्टोबर या दिवशीही निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली होती. या वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक मतदारसूचीतील त्रुटी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. निवडणुकीसाठी ‘व्हीव्हीपॅट’चा उपयोग केला जाणार नसेल, तर बॅलेट पेपरचा उपयोग करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.