महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने महाराष्ट्रात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम !

लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी !

शस्त्रपूजन करतांना रणरागिणी शाखेच्या महिला

मुंबई – महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये आत्मबळ आणि शौर्याची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने विजयादशमीच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी ‘शस्त्रपूजन’ आणि ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. या उपक्रमांमधून महिलांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सक्षम बनवणे, त्यांच्यात संघटनात्मक शक्ती वाढवणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जळगाव येथे भाजपचे आमदार सुरेशमामा भोळे यांना युवतींनी ‘महाराष्ट्रात लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधी कायदा आणला जावा’, या विषयाची निवेदन देण्यात आले. अशाच प्रकारे राज्यातील विविध लोकप्रतिनिधींना निवेदने दिली जात आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या उपक्रमांना राज्यभरातून महिला आणि युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा निर्धार व्यक्त केला.

रणरागिणी शाखेच्या वतीने करण्यात आलेले शस्त्रपूजन

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. रणरागिणी शाखेने राज्यभरात आयोजित कार्यक्रमांमध्ये तलवार, दांडपट्टा, भाले, कट्यार यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले.

२. ‘मैं हूँ दुर्गा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमांनी महिलांना त्यांच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून दिली. या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये कराटे, लाठीकाठी आणि जुडो यांसारख्या प्रशिक्षण प्रकारांचा समावेश होता.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !

महिलांना मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सशक्त करण्याचा रणरागिणी शाखेचा उद्देश ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा

कु. प्रतीक्षा कोरगावकर

रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी सांगितले , ‘आजची स्त्री अबला नसून ती दुर्गेचेच रूप आहे. समाजात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायद्यावर अवलंबून न राहता, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रक्षणासाठी सक्षम होणे, ही काळाची आवश्यकता आहे. रणरागिणी शाखा स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून हेच शौर्य आणि धाडस महिलांमध्ये जागवत आहे. आमचा उद्देश महिलांना केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सशक्त करून एक निर्भय समाज घडवणे हा आहे.’